देशाची आर्थिक राजधानी म्हणून मानाने मिरवणाऱ्या मुंबईला बहुधा या मानाचं गोड थोडं जास्तच झालं असावं. कारण नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार देशभरात सर्वाधित डायबिटिज पेशंट अर्थात मधुमेहाचे रूग्ण मुंबईत आहेत. 'वर्ल्ड डायबिटिज डे'च्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणातून आलेली ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
इंटरनॅशनल डायबिटिज फेडरेशनने (आंतरराष्ट्रीय मधुमेह संस्था) केलेल्या सर्वेनुसार भारतात सर्वाधिक डायबिटिज पेशंट मुंबईत आहेत. गेल्या साडेतीन वर्षात या संस्थेतर्फे मुंबईसोबतच देशभरातल्या 8 प्रमुख शहरांमध्ये हा सर्वे घेतला गेला.
या सर्वेक्षणानुसार, भारतातल्या 6 कोटी 90 लाख लोकांना डायबिटिजची समस्या असून दरवर्षी 3 लाख 50 हजार रूग्ण डायबिटिजने दगावतात. "जर याच वेगाने भारतातील डायबिटिजचे पेशंट वाढत गेले, तर या बाबतीत चीनला मागे टाकत भारत क्रमांक एकचा देश बनेल. कारण डायबिटिज झालेले सर्वाधिक रुग्ण हे तरूण वयोगटातले आहेत", अशी प्रतिक्रिया एसआरएल डायग्नोस्टिक्सचे डॉ. बी. आर. दास यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली.
हेही वाचा