मुंबईतील महापालिका शाळांत २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात तब्बल ६४ हजार ६८१ विद्यार्थी कुपोषित होते. मात्र, अवघ्या वर्षभरात म्हणजे २०१६-१७ मध्ये महापालिका शाळांमध्ये एकही विद्यार्थी कुपोषित नसल्याची माहिती प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात उघड झाली आहे. वर्षभरात महापालिकेने कुपोषणमुक्तीसाठी नेमकं काय केलं? असा प्रश्नही ‘प्रजा’ने उपस्थित केला आहे.
मुंबई प्रेस क्लबमध्ये नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत मुंबई महापालिका शाळा आणि अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबतचा अहवाल प्रजा फाऊंडेशनने प्रसिद्ध केला. यामध्ये कुपोषित विद्यार्थ्यांसह प्रमाणाहून कमी वजन असलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी जाहीर करण्यात आली. माहिती अधिकार कायद्यान्वे ही माहिती उघड झाली आहे.
या अहवालात महापालिका शाळांतून अवघ्या वर्षभरात ६४ हजार ६८१ विद्यार्थी कुपोषणमुक्त झाल्याचा दावा करण्यात आला असून महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांत प्रमाणाहून कमी वजन असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तब्बल ८४ टक्क्यांनी घट झाली आहे.
२०१६-१७ साली प्रमाणाहून वजन कमी असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ७३ हजार ११२ इतकी होती. मात्र, अवघ्या वर्षभरात (२०१७-१८ मध्ये) हा आकडा ११ हजार ७२० पर्यंत घसरला आहे. त्यामुळे महापालिका शाळांतून एका वर्षात कुपोषणमुक्ती करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांचं वजन प्रमाणात आण्यासाठी प्रशासनानं नेमकी कोणती उपाययोजना केली ?असा सवालही प्रजाने उपस्थित केला आहे.
महापालिका शाळांसोबतच आयसीडीएस योजनेअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या अंगणवाड्यांमध्ये यंदा ८९ अंगणवाडी सेविका आणि ७५४ मदतनीसांची कमतरता असल्याचं प्रजाने निदर्शनास आणून दिलं. अंगणवाडीत येणाऱ्या ५ वर्षांखालील बालकांपैकी १८ टक्के लहान मुलांचं वजन प्रमाणाहून कमी आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे राज्यातील कुपोषणाच्या प्रश्नावर हिवाळी अधिवेशन, अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि पावसाळी अधिवेशनात एकूण २६ आमदारांनी १४७ प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, मुंबईतील फक्त ५ आमदारांनीच यावर प्रश्न उपस्थित केले होते.
हेही वाचा-
राज्यात स्वाईन फ्लूमुळे 199 रुग्णांचा मृत्यू - दिपक सावंत
केईएममध्ये ब्रेन स्ट्रोकवर मिळणार अद्ययावत उपचार