शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे ‘मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण’(एमएमआरडीए)चा आवाका वाढवण्यासाठी राज्य मंत्रीमंडळानं मान्यता दिली आहे. त्यामुळे वसई, पनवेल, अलिबाग, खालापूर आणि पेण तालुक्याचा उर्वरित भाग आणि पालघर तालुका पूर्णपणे या प्राधिकरणात समाविष्ट होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यासह काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
मुंबईसह आसपासच्या परिसराचा काही वर्षात मोठ्या प्रमाणात विकास झाला. या परिसराचं योग्य नियोजन आणि विकास करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. त्यानुसार मुंबई महानगर प्रदेशाचे सध्याचे भौगोलिक क्षेत्र हे 4335 चौरस किलोमीटर इतके आहे. त्यात पेण आणि अलिबागचा काही भागांचा समाविष्ठ करण्यात आला होता. नव्यानं मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणचा आवाका वाढून आता त्यात 2 हजार चौरस किलोमीटरची वाढ होणार आहे.
नवी मुंबईतील घरांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्या झपाट्याने झालेल्या विकासामुळे कंळबोली, कामोठे, करंजाडे आणि आसपासच्या परिसरातील घरांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी नागरिकांची वाढती लोकसंख्या पाहता अनेक महत्वाचे प्रकल्प होणे ही काळाजी गरज मानली जात आहे.
हेही वाचा