जगाला सत्य, अहिंसेचा मानवतावादी संदेश देणारे महात्मा मोहनदास गांधी. दक्षिण आफ्रिकेत वर्णद्वेषाविरुद्ध लढा देणारे लढवय्ये आणि ब्रिटिशांविरोधात अहिंसाचे लढा उभारणारे लढवय्ये म्हणजे बॅरिस्टर गांधी. स्वतंत्र विचार आणि शुद्ध आचार स्वत: आचरणात आणून ते तळागाळात पोहोचवणारे सामान्यांचे असामान्य नेतृत्व म्हणजे गांधी. याच गांधी नावाच्या महान लढवय्याच्या वास्तव्यानं पावन झालेली भूमी म्हणजे मुंबईचं मणिभवन !
मुंबईतल्या गिरगाव इथल्या गावदेवी परिसरात मणिभवन असून महात्मा गांधी यांचं ते निवासस्थान आहे. १९१७ ते १९३४ या काळात गांधीजी या ठिकाणी राहत होते. गांधीजींनी या काळात वापरलेल्या अनेक वस्तू या ठिकाणी पाहता येऊ शकतात. मणिभवन ही दोन मजली इमारत गांधी विचारानं आजही जगाला प्रेरणा देत आहे.
मणिभवनात ५० हजार संदर्भ ग्रंथ आहेत. या वाचनालयाचा एक विभाग महिल्या मजल्यावर आहे. तिथल्या सभागृहात गांधी विचारधारेवर बैठका, सभा, परिसंवादातून विचारमंथन घडवून आणलं जातं. तर दुसऱ्या मजल्यावर गांधीजींच्या बैठकीची आणि कामकाजाची खोली आहे. आजपर्यंत ती तशीच्या तशी जतन करण्यात आली आहे. मणिभवनाच्या प्रवेशद्वारावरील कक्षात पुस्तके , पोस्टल तिकीट, मूर्तीची विक्री करण्यात येते. सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मणिभवनाचे दरवाजे खुले असतात.
महात्मा गांधी यांच्या आयुष्यातील जवळपास २८ महत्त्वाचे प्रसंग बाहुल्यांच्या माध्यमातून जिवंत करण्यात आले आहेत. सुशीलाबाई गोखले-पटेल यांच्या अफलातून कलेतून या बाहुल्यांचा जन्म झाला. याशिवाय गांधी जीवनावर आधारित फोटो प्रदर्शनीही गांधीजीच्या काळाचे दर्शन घडवते.
गांधीचे विचार, आचार त्यांच्या जीवनातील ठळक घडामोडी, त्यांनी लिहिलेली, त्यांना आलेली पत्रं, गांधी यांनी वापरलेल्या वस्तू, साबरमती आणि सेवाग्राम आश्रम यांच्या प्रतिकृतींच्या माध्यमातून महात्मा गांधी समजावण्याचा प्रयत्न केला आहे.
महात्मा गांधी यांचे मित्र रत्नांचे व्यापारी रेवाशंकर झवेरी यांचं मूळघर म्हणजे मणिभवन. महात्मा गांधी यांचे गुरु गोपाळ कृष्ण गोखले यांनी त्यांना संपूर्ण देश पाहून घ्या असा आदेश दिला. या आदेशानंतर १९१७ ते १९३४ या कालखंडात गांधीजींनी मुंबईतल्या मणिभवन इथं मुक्काम केला. कापूस पिंजणे, सुतकताईचे प्राथमिक धडे गांधींनी इथंच गिरवले. देशभरात त्याकाळी सुरू असलेल्या हिंदू-मुस्लिम दंगली थांबाव्यात म्हणून याच ठिकाणाहून ऐतिहासिक उपोषण सुरू केलं होतं. स्वराज्यासाठी असहकार आंदोलन छेडण्याचा निर्णय याच जागेवरून झाला.
हेही वाचा