आपली मुंबई कुणाच्या तरी लग्नात कुणीतरी कुणालातरी दिली होती असं जर तुम्हाला कुणी सांगितलं तर? होय...आपली मुंबई हुंड्यात मिळाली होती! आत्ता नाही बरं का..तर साडेतीनशे वर्षांपूर्वी! आता तुम्ही म्हणाल की हुंडा पैसे, दागिने, गाडी किंवा घर अशा काहीतरी स्वरुपात दिल्याची प्रथा ऐकिवात आहे. आख्खच्या आख्ख शहर कुणी कसं हुंड्यात देऊ शकेल? सतराव्या शतकातल्या एका ग्रॅण्ड मॅरेजची ही गोष्ट आहे. आणि या लग्नात मुलीकडच्यांनी थेट आपली मुंबईच हुंडा म्हणून नवऱ्या मुलाला देऊन टाकली. मुंबईचा हा रंजक इतिहास कदाचित तुम्हाला माहीत नसावा!
सात बेटांवर वसलेल्या मुंबईचे महत्त्व पोर्तुगीज आणि ब्रिटिशांना कधीच कळलं होतं. त्यामुळेच सतराव्या शतकाच्या प्रारंभापासूनच इंग्रज, मुंबई बेटावर आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत होते.
लढाई करुन किंवा मुंबई विकत घेऊन मुंबई हस्तगत करण्याचा ब्रिटिशांचा प्रयत्न चालू होता. अखेर २३ जानेवारी १६६१ मध्ये ब्रिटिशांच्या प्रयत्नांना यश मिळालं. इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स आणि पोर्तुगालची राजकन्या कॅथरिन यांचं लग्न झालं. आणि हाच मुंबईसाठी टर्निंग पॉईंट ठरला. या लग्नात पोर्तुगीजांनी ब्रिटिशांना हुंडा म्हणून मुंबई बेट दिलं. पण मुंबई बेटावर ताबा मिळण्यासाठी ब्रिटिशांना चार वर्ष लागली. १६६५ मध्ये मुंबईवर अधिकृतरित्या ब्रिटिशांनी ताबा मिळवला.
१६७८ मध्ये ब्रिटिशांनी रुपयाचं पहिलं नाणं काढलं.
मुंबईच्या सात बेटांवर कोळी बांधव रहायचे. मुंबाआई ही कोळी बांधवांची देवता होती आणि या देवतेच्या नावावरुन मुंबई हे नाव पडलं.
१५४८ ते १६२६ या दरम्यान पोर्तुगीजांनी बॉम्बे कॅसल हा बालेकिल्ला बांधला. त्यानंतर मुंबईचा ताबा मिळाल्यावर इंग्रजांनी त्यात आपल्याला सोयीस्कर असे बरेच बदल केले आणि शहराभोवती तटबंदी घातली. मुंबईच्या किल्ल्याची तटबंदी १८६२-६४ दरम्यान तोडून टाकण्यात आली. त्या भिंतीचा एक अवशेष आजही सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या आवारात पाहता येईल.
मुंबईचा फोर्ट परिसर हा प्रामुख्याने व्यापारी आणि कार्यालयीन परिसर आहे. निवासी मनुष्यवस्ती इथे अगदी तुरळकच सापडते. ब्रिटिशांच्या काळात हा परिसर व्यापाराचं महत्त्वाचं केंद्र होतं. या भागातला किल्ला अर्थात फोर्ट हे त्याकाळी या भागाचं कामकाज पहाण्याचं ठिकाण होतं. त्यामुळेच या परिसराला फोर्ट हे नाव पडलं.
फोर्ट येथे असणारे ताज हॉटेल १६ डिसेंबर १९൦३ साली बांधले गेले. १८६५ मध्ये मुंबईतल्या प्रसिद्ध वॉटसन हॉटेलच्या दरबानाने जमशेदजी टाटांना आत जाण्यास मनाई केली होती. कारण ते हॉटेल फक्त इंग्रजांसाठीच होतं. हा अपमान सहन न झाल्यामुळे टाटांनी भारतीयांसाठी आंतरराष्ट्रीय तोडीचे हॉटेल बांधण्याचा निश्चय केला. त्यातूनच ताज हॉटेल बांधलं गेलं असं सांगितलं जातं.
सीएसटीएम स्टेशनच्या मागच्या बाजूला ब्रिटिशांनी बांधलेल्या वाढीव तटबंदीचा भाग अजूनही बऱ्यापैकी शाबूत आहे. या वाढीव बांधकामाला ब्रिटिशांनी नाव दिलं 'फोर्ट सेंट जॉर्ज'. सध्याचं सेंट जॉर्ज हॉस्पिटल याच भागावर उभारण्यात आलं. त्यामुळे त्याला 'सेंट जॉर्ज' असं नांव दिलं गेलं.
चर्चगेट हा त्यावेळचा मुख्य दरवाजा होता. सध्याच्या फ्लोरा फाऊंटनसमोर तो उभारण्यात आला होता.
१८४३ मध्ये अपोलो स्ट्रीट येथे गव्हर्नमेंट डॉकयार्डसमोर हे आईस हाऊस बांधण्यात आले होते. त्यावेळी येथे अमेरिकेतून बर्फाची आयात करण्यात येत असे. १८७൦ मध्ये हे आईस हाऊस पाडून टाकण्यात आले. कालांतराने त्याच ठिकाणी कामा हाऊसची इमारत बांधण्यात आली.
१६५१ मध्ये दादरमधलं पोर्तुगीज चर्च बांधण्यात आलं. आजही हा चर्च दादरमध्ये पाहता येईल.
माहिमचं सेंट मायकल चर्च हे मुंबईतील प्रसिद्ध प्रार्थना स्थळ आहे. १५३४ मध्ये पोर्तुगीजांनी हे चर्च बांधलं. नंतर त्याची वेळोवेळी पुनर्बांधणी करण्यात आली. १७७३ मध्ये या चर्चचा कायापालट करण्यात आला.
कायम धावणारी मुंबई, हल्ल्यांमध्ये मोडून पडली तरी निर्धारानं उठून उभी रहाणारी मुंबई, देशाची आर्थिक राजधानी असणारी मुंबई, महाराष्ट्राचं सत्ताकेंद्र असलेली मुंबई...अशा अनेक प्रकारे मुंबईची आपल्याला ओळख आहे. किंबहुना, संपूर्ण जगात मुंबईची काहीशी अशीच ओळख आहे. पण 'हुंड्यात मिळाले मुंबई' ही ओळख मात्र फारच थोड्या लोकांना माहीत असेल. त्यासोबतच मुंबईतल्या आत्ताच्या अनेक ठिकाणांमागच्या इतिहासापासून आपण अनेकदा अनभिज्ञ असतो. पोर्तुगीज चर्च, कामा हॉस्पिटल, सेंट जॉर्ज ही नावं आपण अनेकदा वाचली असतील. पण त्या नावांमागे असा काही इतिहास असेल याचा मात्र आपण विचार केला नसावा. आर्थिक केंद्र असणाऱ्या या मुंबापुरीत अजून किती रंजक इतिहास दडलेला आहे याचा आपल्याला अंदाजही नसेल. तो तसा तुम्हाला सापडेलही...एकदा शोधून तर बघा!