भांडुप पोटनिवडणुकीत काही नेत्यांचं ऐकून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली चूक मनसेच्या ६ नगरसेवकांना पक्षात घेताना सुधारली. मनसेच्या ६ नगरसेवकांना पक्षात घेताना शिवसेनेच्या नेत्यांना कोणतीही कल्पना न देता अॅड. अनिल परब, मिलिंद नार्वेकर आणि संजय पोतनीस यांच्या मदतीने मोहीम फत्ते केली. उद्धव ठाकरेंचा हा गनिमी कावा यशस्वी करण्यात या तिघांना यश आल्यामुळे 'मोठ्या' नेत्यांशिवायही शिवसेनेला महत्त्वाचे निर्णय यशस्वी करता येतात, याची खात्री पटली.
भांडुपच्या पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराचा पराभव आता त्यांच्याच पक्षाच्या जिव्हारी लागलाय. या निवडणुकीत विजयी झालेल्या प्रमिला पाटील यांची सून जागृती पाटील, त्यांचे पती प्रतीक आणि दीर कौशिक भाजपात जाण्यापूर्वी शिवसेनेच्या संपर्कात होते. या पाटील कुटुंबाला शिवसेनेत घेण्याचं निश्चित झालं होतं. परंतु, आयत्यावेळी शिवसेनेच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचे कान भरल्याने त्यांना पक्षात न घेण्याचे ठरलं आणि याच मोक्याची संधी साधत भाजपाने विजयी होणारे सावज हेरत महापालिकेतील आपली नगसेवकांची संख्या वाढवली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक आणि कौशिक पाटील यांना त्यांच्या आईच्या निधनानंतर शिवसेनेत घेण्याचं निश्चित झालं होतं. उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी त्यांना पक्षात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्यांना पक्षात घेण्यात अशोक पाटील वगळता शिवसेनेचे वातावरण अनुकूल होतं. परंतु शिवसेनेच्या काही नेत्यांनी आणि सल्लागारांनी आयत्या वेळेला खो घातला. त्यामुळे पाटील कुटुंबाचा शिवसेनेतील प्रवेश व्हायचा राहिला. अन्यथा निवडणुकीत वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, असं शिवसेनेच्या काही नेत्यांचं म्हणणं आहे.
मात्र, भांडुप निकालानंतर मनसेचे ज्या ६ नगरसेवकांचा एक गट फोडण्यात आला, त्याची जबाबदारी केवळ विभाग प्रमुख आमदार अॅड. अनिल परब, आमदार संजय पोतनीस आणि मिलिंद नार्वेकर यांच्यावर सोपवण्यात आली होती. ही खलबते गुरुवारीच सुरू झाली आणि एका मंत्र्याने हॉटेलमध्ये रूम बुक केले, तर त्यासाठी लागणाऱ्या गाड्या संजय पोतनीस यांनी पुरवून दिवसभरात त्या सहाही नगरसेवकांना एकत्र आणून, त्यांच्या गटाचं पत्र कोकण विभागीय आयुक्त यांना सादर केलं. त्यानंतर त्यांना मातोश्रीत आणून शिवसेनेत प्रवेश दिला. पण या सर्व मोहिमेत नगरसेवक कुठे आहेत? याची माहिती परब, नार्वेकर आणि पोतनीस यांच्याशिवाय कोणालाच नव्हती, असे सूत्रांचं म्हणणं आहे.
हेही वाचा -
थिअऱ्यांचं राजकारण आणि जनतेलाच मुरडा!
भांडुप पोटनिवडणूक, सासूच्या जागी सून आली निवडून
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)