भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. यामुळे पक्षनेतृत्वाने राज्यात नवीन प्रदेशाध्यक्ष निवडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. नवीन प्रदेशाध्यक्षपदासाठी सध्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची नावे आघाडीवर आहे.
दानवे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभा निवडणुकीपर्यंत दणदणीत यश मिळवलं आहे. त्यामुळे भाजपाला विजयी सीलसीला सुरू ठेवायचा असल्यास योग्य प्रदेशाध्यक्षाची निवड करावी लागणार आहे. विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने राज्यात पुन्हा एकदा सरकार स्थापण्यासाठी भाजपाने रणनिती आखायला सुरूवात केली आहे. राज्यात भाजपाच्या जास्तीत जास्त जागा जिंकून आणण्यात प्रदेशाध्यक्षांची मोठी भूमिका असणार आहे. त्यादृष्टीने राज्यातील सर्व नेते, पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय ठेवणारा आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना प्रेरित करणारा प्रदेशाध्यक्ष निवडण्याकडे भाजपा पक्षनेतृत्वाचा कल असणार आहे.
वरील नावांसोबतच शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आ. सुरेश हळवणकर यांचीही नावे चर्चेत आहेत. महिन्याभरात ही निवड अपेक्षित असल्याचं समजत आहे.
हेही वाचा-
मनसे हा दुर्मिळ प्रजातीचा पक्ष, सुधीर मुनगंटीवार यांची खोचक टीका
रेल्वे खातं मागणाऱ्या शिवसेनेच्या वाट्याला अवजड उद्योग, सावंत झाले नाराज