भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथविधीदरम्यान ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा दिल्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी नाराजी व्यक्त करत उदयनराजेंना समज दिली. यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. हा शिवरायांच्या वंशजांचा अपमान आहे की नाही, असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. त्यावर राज्यसभेची शपथ घेताना जे काही झालं, त्यामुळे शिवरायांचा कुठेही अपमान झालेला नाही. तसं असतं तर मी तिथेच राजीनामा दिला असता, हे निव्वळ राजकारण असल्याचा खुलासा भाजपचे नवनिर्वाचीत खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. (bjp mp udayanraje bhosale reply shiv sena mp sanjay raut over oath taking controversy in rajya sabha )
शिवाय मी शिवरायांचा वंशज आहे की नाही, यावर पुरावे मागणारे संजय राऊत असा सवाल उपस्थित करतात म्हणजे आश्चर्यच आहे, असा टोलाही उदयनराजे यांनी राऊतांना हाणला.
Today taking a oath of member of rajya sabha in parliment. pic.twitter.com/GdQwWzhJ8l
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) July 22, 2020
हेही वाचा- शिवरायांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान?, संजय राऊतांचा भाजपला चिमटा
घटनेला धरूनच बोलले
यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की, जे घडलंच नाही त्यावरुन सध्या राजकारण सुरु आहे. मी गप्प बसणाऱ्यांपैकी नाही हे सर्वांना ठाऊक आहे. मी शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. त्यावर काँग्रेसच्या खासदाराने आक्षेप घेतला. त्यानंतर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी फक्त समज दिली की असं वक्तव्य करणं राज्यघटनेला धरुन नाही. त्यामुळे घेतलेली शपथच राज्यसभेच्या रेकॉर्डवर जाईल. व्यंकय्या नायडू सभापती या नात्याने घटनेला धरुनच बोलले. ते चुकीचं बोलले असते तर तिथेच बोललो असतो. मीच त्यांना माफी मागायला लावली असती, असं उदयनराजे यांनी स्पष्ट केलं.
शिवरायांच्या नावाचा अपमान होण्याचा तर प्रश्नच इथं उद्धवत नाही, तसं असतं तर मी तिथंच राजीनामा दिला असता. महाराजांच्या नावाने आतापर्यंत भरपूर राजकारण झालं आहे. त्यामुळे अनेकांनी जो निरर्थक वाद सुरु केला आहे. माझी त्या सर्वांना वाद थांबवण्याची हात जोडून विनंती आहे. उलट हा प्रश्न व्यंकय्या नायडूंना विचारण्याऐवजी आक्षेप घेणाऱ्या काँग्रेस खासदाराला विचारायला हवा. शरद पवार तिथंच बसले होते. त्यांना विचारा,” असं उदयनराजे यांनी स्पष्ट केलं.
नेमकं काय झालं?
भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर उदयनराजे यांनी शेवटी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा दिल्या. त्यावर, “हे राज्यसभेचं सभागृह नसून माझं दालन आहे. दालनात घोषणाबाजी करू नये. सभागृहातही घोषणा देण्याची मुभा नसते. शपथ घेताना घोषणा देऊ नका त्याची नोंद होणार नाही,” अशा शब्दांत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजे यांना समज दिली.
हेही वाचा - मुलाचं नाव शिवाजी ठेवण्याआधी साताऱ्यातून एनओसी घ्यायची का? जितेंद्र आव्हाडांचा उदयनराजेंना प्रश्न