गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने एकमेकांची उणीधुणी काढणाऱ्या शिवसेना आणि भाजपानं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकत्र येण्याचा निर्णय घेत युतीवर शिक्कामोर्तब केला आहे. येत्या लोकसभा व विधानसभेसाठी निवडणुकींसाठी ही युती करण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी याबाबतची घोषणा केली आहे.
२०१४ साली निवडणुका झाल्यानंतर केंद्रात आणि राज्यात शिवसेना-भाजपाची सत्ता आली. त्यानंतर विविध मुद्दयांवरून शिवसेना-भाजपाच्या नेत्यांनी एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण सुरू केले होते. त्यानंतर शिवसेनेने 'एकला चलो रे' ची भुमिका घेत स्वबळाचा नारा दिला. यावर भाजपाने शिवसेनेचे एकमेकांवर टीकास्त्र सुरू होते. त्यामुळे भविष्यात युती होणे अशक्यच असल्याचे म्हटलं जात होते. त्यातच शिवसेनेने युतीसाठी काही अटी घातल्याचं समोर आल्यानं युतीसाठी संभ्रम अधिक वाढला होता.
काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्री निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेच्या अटीबांबत चर्चा करण्यात आली. या चर्चेत अनेक महत्त्वाच्या अटी मान्य झाल्यानं शिवसेना -भाजपा एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अमित शहा हे सोमवारी 'मातोश्री' निवासस्थानी येणार असून उद्धव यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर युतीची घोषणा होऊ शकते, असे स्पष्ट केलं होते. युतीतील अटी-शर्तींबाबतची चर्चा पूर्ण झाली आहे,' असंही राऊतांनी सांगितलं होते.
यानुसार सोमवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. विशेष म्हणजे या चर्चेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमित शहा, उद्धव ठाकरे, आणि आदित्य ठाकरे एकाच गाडीतून मातोश्री बाहेर पडताना दिसले आणि युती होणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यानंतर अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत लोकसभा आणि विधानसभेसह आगामी सर्व निवडणुका शिवसेना -भाजप एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट केले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ पैकी २३ जागा शिवसेना तर २५ जागा भाजप लढेल. विधानसभेच्या जागावाटपाबाबत भाजप मित्रपक्षांशी चर्चा करेल. त्यांना सोडून ज्या जागा राहतील त्यात शिवसेना-भाजप निम्म्या-निम्म्या जागांवर लढेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
गेल्या २५ वर्षांपासून शिवसेना-भाजपाची युती आहे. हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रात आणि देशात एकत्रच वावरले आहे. गेल्या काही दिवसांपासून आपापसांत काही मतभेद झाले होते. परंतु दोन्ही पक्षांमध्ये हिंदूत्वाचा समान दुवा असल्याने आमचा मुळ विचार सारखाच आहे. तसेच इतके वर्षे महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात एकत्र राहिलो असून पुढेही एकत्र लढावे अशी जनभावना आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा एकदिलाने एकत्र येत आगामी सर्व निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतल्याचे
मुख्यमंत्री म्हणाले.
त्याशिवाय आता काही पक्ष एकत्र येऊन राष्ट्रीय विचारांना आव्हान देण्याचा प्रयत्न करत असताना हे आव्हान परतवून लावण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. सत्ता, पदे यापुरती ही युती मर्यादित नसून त्या पलीकडे जाऊन व्यापक देशहित डोळ्यापुढे ठेऊन ही युती करण्यात आली आहे. शेतकरी, सामान्य जनता, गरिबांचं हित जपण्याचा त्यांचा आग्रह राहिला. अयोध्येत लवकरात लवकर राम मंदिराची उभारणी व्हायला हवी, ही त्यांची मागणी होती. या मागणीचे पूर्ण समर्थन भाजप करत आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकारने आधीच अयोध्येतील अविवादित ६३ एकर जमीन मंदिर न्यासाला देण्याचा निर्णय घेऊन मंदिराचा मार्ग सुकर केला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे व्यापक देशहित समोर ठेऊन आम्ही युतीचा निर्णय घेतला असून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर निश्चितपणे पुन्हा एकदा एनडीएचं सरकार केंद्रात येईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष पुन्हा 'मन'से एकत्र आले आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणताच पत्रकार परिषदेत हास्यस्फोट झाला. त्यावर लगेचच तुमच्या मनात जे मनसे आहे ते मला म्हणायचे नाही हे 'मनसे म्हणजे दिलसे' असे समजावे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
हेही वाचा -
बोर्डांच्या परिक्षेवेळी शिक्षकांचं 'असहकार आंदोलन'!