एका बाजूला शिवसेना- भाजपा युतीच्या चर्चेचं गुऱ्हाळ रंगात आलेलं असताना काँग्रेसलाही समविचारी पक्षांच्या हाताची गरज भासू लागली आहे. येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर विरोधातील सर्व समविचारी पक्षांनी एकत्रित येऊनच निवडणूक लढवली पाहिजे. अशा समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याची काँग्रेसची तयारी असल्याची भूमिका काँगेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मांडली. मुंबईतील काँग्रेस मुख्यालयात आयोजत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत काय रणनिती असावी यावर चर्चा करण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या गांधी भवन येथील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठीकीत समविचारी पक्षांसोबत आघाडी करावी की नाही? यावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. या चर्चेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल, तर समविचारी पक्षांसोबत आघाडी करावीच लागेल, असा सूर उपस्थित सर्व नेत्यांनी आळवला. या बैठकीचा अहवाल राहुल गांधी यांना देण्यात येणार असल्याचंही अशोक चव्हाण यांनी सांगितलं.
या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, विजय वडेट्टीवार, खा. हुसेन दलवाई, माजी आ. माणिकराव जगताप, प्रदेश सरचिटणीस गणेश पाटील उपस्थित होते.
प्रदेश काँग्रेस कमिटीच्या बैठकीत समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्यावर एकमत झालं आहे. काँग्रेस आघाडीसाठी सकारात्मक भूमिका घेत आहे. इतर पक्ष देखील याबाबती सकरात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षा चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली.
हेही वाचा-
शिवसेनेला हवंय मुख्यमंत्रीपद! बंद दाराआडची खेळी
संपर्क अभियान : सलीम खान, सलमान खानला भेटले गडकरी