'संपर्क फाॅर समर्थन' म्हणत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती. या भेटीत उद्धव ठाकरे आणि शहा यांच्यात तब्बल २ तास बंद दाराआड चर्चा झाली. पण या चर्चेत नेमकं काय झालं हे अद्यापपर्यंत गुलदस्त्यात आहे. मात्र बंद दाराआड झालेल्या चर्चेतल्या एक-एक गोष्टी सूत्रांच्या हवाल्याने बाहेर येऊ लागल्या आहेत. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी विधानसभेच्या १५२ जागांसह थेट मुख्यमंत्री पदाची मागणी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सेना-भाजपामध्ये चांगलचं खटकलं असून पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत सेनेनं भाजपाला चांगलाच अंगावर घेतलं आहे. तब्बल सव्वा दोन लाख मत घेत शिवसेनेनं भाजपाला घाम फोडल्यावर लागलीच शहा 'संपर्क फाॅर समर्थन' म्हणत मातोश्रीवर धडकले. या भेटीत उद्धव ठाकरे आणि शहा यांच्यामध्ये तब्बल २ तास चर्चा झाली. यावेळी शहा यांच्याबरोबर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. पण युती आणि जागावाटपाबाबत जी काही मुख्य चर्चा झाली ती केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे नि शहा यांच्यामध्येच.
या बैठकीत नेमकं काय झालं हे समोर आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी युतीसाठी सकारात्मकता दर्शवली आहे, पण ही सकारात्मकता दर्शवतानाच भाजपाला पुन्हा कोंडीत पकडत आपली ताकद दाखवण्यासाठी नवी खेळी खेळली आहे. पालघर पोटनिवडणुकीनंतर सेनेला आपली ताकद कळाल्यानं भाजपासमोर उद्धव ठाकरे यांनी थेट विधानसभेच्या १५२ जागांची मागणी केली आहे. इतकंच काय तर मुख्यमंत्रीपदही मागितलं आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या या प्रस्तावावर चर्चा करण्याचं आश्वासन शहा यांनी दिल्याचं समजत आहे. पण उद्धव ठाकरे हे मात्र आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचीही चर्चा आता रंगली आहे.
भाजपाच्या काही नेत्यांना मात्र १५२ जागा सेनेला देणं मान्य नसून त्यांनी आपलं म्हणणं शहा यांच्यापर्यंत पोहचवलं आहे. तर भाजपा १५२ एेवजी १३० जागाच देण्यास तयार आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांची खेळी यशस्वी ठरते की, समर्थन न घेताच भाजपा एकला चलो रे म्हणते याकडेच आता सर्वांच लक्ष लागलं आहे.
हेही वाचा-
संपर्क अभियान : सलीम खान, सलमान खानला भेटले गडकरी