मुंबई हे शासन आणि महापालिका पुरस्कृत अपघातांचं शहर झालं आहे. भाजपा, शिवसेनेच्या भ्रष्ट कारभारामुळं मुंबईकरांचं जगणं कठीण आणि मरण सोपं झालं आहे. सातत्याने पूल कोसळण्याच्या आणि आगींच्या घटनांमध्ये मुंबईकर मारले जात आहेत. या बेजबाबदार कारभाराची जबाबदारी देखील घेतली जात नाही. हे अत्यंत संतापजनक असून भाजपा-शिवसेनेला जराही शरम असेल तर महापौर आणि मनपा आयुक्तांची तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
भाजपा शिवसेनेच्या दृष्टीनं मुंबईकरांचा जीव एवढा स्वस्त झाला आहे का? असा संतप्त सवाल करून चव्हाण म्हणाले की, मुंबई महापालिका भ्रष्टाचाराचा अड्डा बनली आहे. ६ महिन्यांपूर्वी ज्या पुलाचं सुरक्षा ऑडिट करून पुलाला सुरक्षित घोषित केलं होतं, तोच पूल काल पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. ६ लोकांचा मृत्यू झाला आणि ३० पेक्षा जास्त मुंबईकर गंभीर जखमी झाले आहेत. या पुलाचं ऑडिट कुणी केलं? या ऑडिटमध्येही कमिशन घेतलं का? मुंबईकरांच्या जन्म दाखल्यापासून मृत्यूच्या दाखल्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी बकासुराप्रमाणे पैसे खाल्ले जातात.
निर्ढावलेले महापालिकेतील सत्ताधारी आणि सरकार अशा घटना घडल्यावर एकमेकांवर जबाबदारी ढकलून रिकामे होतात. पण कधीही जबाबदारी निश्चित केली जात नाही, कारवाई होत नाही. एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेप्रकरणी अद्याप कोणावरही कारवाई झाली नाही. कमला मिलसारख्या निरनिराळ्या आगीच्या घटना, इमारती कोसळल्याच्या किंवा पूल पडण्याच्या घटना असतील यातून मुंबईकरांना मारण्याचं काम सातत्याने सुरु असल्याचंही ते म्हणाले.
मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या भ्रष्ट नेत्यांना कामाचा दर्जा चांगला राखण्याऐवजी कमीशन खाण्यातच जास्त रस आहे, हे वारंवार दिसून येत आहे. त्यामुळं यांना जराही शरम असेल तर तात्काळ महापौर व आयुक्तांची हकालपट्टी करून सर्व पादचारी पुलांचे पुन्हा ऑडिट करावं. तसंच या घटनेला जबाबदार असणाऱ्या दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.
हेही वाचा -
पवारांची तिसरी पिढी निवडणुकीच्या रिंगणात