कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून शासन निष्क्रीय झालं आहे. या संकटाच्या काळात विरोधी पक्ष म्हणून भाजपने सातत्याने सहकार्याची भूमिका घेतली, परंतु महाविकास आघाडी सरकार विश्वासात न घेताच चुकीचे निर्णय घेत सुटलं आहे. यामुळे जनता तरी आता किती सहन करणार? असा प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारला जागं करण्यासाठी महाराष्ट्र बचाव आंदोलन पुकारण्यात आल्याचं विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार २२ मे रोजी दुपारी मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित महाराष्ट्र बचाव आंदोलनात आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि भाजप नेते विनोद तावडे देखील उपस्थित होते.
५० हजार कोटींचं पॅकेज द्या
राज्यात सरकार नावाची यंत्रणा अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपाचे हे आंदोलन सरकारला जागं करण्यासाठी आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४० हजारांवर गेली आहे. केवळ रूग्णवाहिका नाही, म्हणून अनेकांचे मृत्यू होत आहेत. आरोग्यसेवेकडे अजूनही सरकारने गांभीर्याने पाहिले नाही, तर पुढचे परिणाम अतिशय गंभीर असतील.
हेही वाचा - संजय राऊतांच्या राम मंदिरावरील ‘या’ वक्तव्याने सोशल मीडियावर भडका!
सर्वाधिक रूग्ण, सर्वाधिक मृत्यू!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 22, 2020
आरोग्य व्यवस्था पूर्णत: कोलमडलेली, शासनाची निष्क्रियता!
राज्य सरकारसोबत सातत्याने सहकार्याची भूमिका घेतली.
मात्र जनता सहन तरी किती करणार?
आज मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात #MaharashtraBachao आंदोलनात सहभाग घेतला. @BJP4Maharashtra pic.twitter.com/aGjGswKNuj
राज्यातील पोलिसांची अवस्था तर अतिशय विदारक आहे. त्यांना कोणत्याही सुविधा दिल्या जात नाही. आमचे पोलिस बांधव तर प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असताना त्यातील सुमारे १४०० पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांच्याही उपचारांची काळजी सरकारकडून घेण्यात येत नाही. हे अतिशय वेदनादायी चित्र आहे. लाॅकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे हाल सुरू आहेत. त्यामुळे शेतकरी, १२ बलुतेदार आणि असंघटीत कामगारांना ५० हजार कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषण सरकारने करावी, अशी मागणी यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
सरकार अपयशी
तर,महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रसार रोखण्यास महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरलं आहे. महाविकास आघाडी राज्य सरकारच्या नाकर्तेपणाकडे आता दुर्लक्ष केलं तर ते राज्याच्या भविष्यासाठी धोकादायक ठरेल. राज्य शासनाने तात्काळ या व अशा सर्वच मुद्द्यावर योग्य निर्णय घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणावी या हेतूने हे महाराष्ट्र बचाओ आंदोलन भारतीय जनता पक्षाने उभं केलं आहे.
एकिकडे १०० टक्के मोफत उपचारांची घोषणा केली असताना, दुसरीकडे मात्र रुग्णालयांना दर ठरवून दिले जात आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारतर्फे अद्याप कुठल्याही आर्थिक पॅकेजची घोषणा नाही. निदान तात्काळ शेतकरी, मजुरांसाठी पॅकेज जाहीर करावं या विनंतीवर राज्य शासनाची काही प्रतिक्रिया नाही, असं भाजप नेते सुभाष देशमुख म्हणाले.
हेही वाचा - ‘हे’ आंदोलन तर मोदींनासुद्धा पटणार नाही- जयंत पाटील