देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे केवळ राज्य प्रशासनच नाही, तर देशपाळीवरील यंत्रणा चिंताग्रस्त झाली आहे. मुंबई आणि दिल्लीतील परिस्थितीचा अभ्यास करून केंद्रीय आरोग्यमंत्री डाॅ. हर्षवर्धन यांनी कोरोनाबाधितांच्या वाढणाऱ्या संख्येमागचं कारण सांगितलं आहे.
२० टक्क्यांचा वाटा
सद्यस्थितीत देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४२ हजार ६७० वर जाऊन पोहोचली आहे, यातील १,३९५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात १२,९७५ कोरोनाबाधितांची संख्या झाली असून यातील ५४८ कोरोनाबाधितांचा राज्यात मृत्यू झाला आहे. ८८०० रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहे. देशातील एकूण रुग्णसंख्येत मुंबईचा वाटा २० टक्क्यांचा आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा हा सर्वाधिक असल्याने सगळ्यांचं लक्ष हे महाराष्ट्राकडेच वेधलं गेलं आहे.
हेही वाचा - धारावीत कोरोना रुग्णांमध्ये तरुणांची संख्या अधिक
नियमांचं काटेकोर पालन नाही
यासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री डाॅ. हर्षवर्धन यांना एका वृत्तवाहिनीने विचारलं असता ते म्हणाले, ग्रामीण भागाच्या तुलनेत मुंबई आणि दिल्ली सारख्या शहरांतील रहिवासी लॉकडाऊनचं गांभीर्याने पालन करताना दिसत नाहीत. काही मोजके लोकं बेजबाबदारपणे रस्त्यांवर, वस्तांमध्ये फिरताना दिसतात. मास्क न लावतानाच इतरांशी जवळीक साधताना दिसतात. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं काटेकाेरपणे पालन करताना दिसत नाहीत. या उलट ग्रामीण भागात सोशल डिस्टन्सिंगचं चांगलं पालन केलं जात आहे. त्यामुळेच ग्रामीण भागांच्या तुलनेत मुंबई, दिल्लीत कोरोनाबाधित रुग्णांचं प्रमाण वाढत चाललं आहे.
झोपडपट्ट्यांमध्ये कठीण
त्याशिवाय दुसरं कारण म्हणजे, परदेश प्रवास करून मोठ्या संख्येने प्रवासी हे मुंबई आणि दिल्लीतील विमानतळांवरच उतरले. त्यांच्या माध्यमांतून इतरांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आणि कोरोनाबाधितांची संख्या वाढली. या दोन्ही शहरांमध्ये झोपडपट्ट्यांचं प्रमाणही लक्षणीय आहे. दाटीवाटीच्या वस्तांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं ही अतिशय कठीण बाब आहे, यामुळे देखील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे, असंही डाॅ. हर्षवर्धन म्हणाले.
हेही वाचा - Coronavirus Update: राज्यात २ हजार कोरोनाबाधित रुग्ण झाले बरे!