राज्यात वाईन शाॅप आणि हाॅटेल सुरू करण्याची परवानगी द्या, अशी राज्य सरकारला सूचना करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. वाईन, डाई आणि फाईन… व्वा! राज बाबू!! असं म्हणत संजय राऊत यांनी शेलक्या शब्दांत राज ठाकरे यांचे कान टोचले आहेत.
राज यांची मागणी काय?
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे राज्याची आर्थव्यवस्था ढासळली आहे, हे लक्षात घेऊन महसुलाचा उत्तम स्त्रोत मानला जाणार मद्यविक्री आणि हाॅटेल व्यवसाय सुरू करायला परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली होती.
हेही वाचा - किती ढोंग करशील संजू बाबा? मनसेचे सरचिटणीस कीर्तीकुमार शिंदेंचा राऊतांना टोला
कोरोना संकटाचा बहाणा
या मागणीचा सामनाच्या अग्रलेखातून चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात लोकांना चिकन, मटण, भाजी, धान्य, दूध, पाणी मिळत आहे, पण खरी आणीबाणी पिणाऱ्यांची झाली आहे. ‘पीनेवालों को पीने का बहाना चाहिए…’ असे नेहमीच म्हटले जाते, पण सध्या मोकळा वेळ आहे, रिकामा मित्रपरिवार आहे, कोरोना संकटाचा बहाणा आहे, पण घरात व बाजारात मद्य नसल्याने मोठय़ा वर्गाची तडफड सुरू आहे. अशा सर्व तगमगणाऱ्या जीवांचे दु:ख कलावंत मनाच्या राज ठाकरे यांनी सरकारदरबारी मांडले आहे. राज्यातील लाखो-कोटी मद्यप्रेमींच्या भावनांची खदखद व्यक्त करून राज महोदयांनी मोठेच उपकार केले आहेत, असं संजय राऊत यांनी लिहिलेल्या अग्रलेखात म्हटलं आहे.
अवस्था भुकेल्या लांडग्यासारखी
पस्तिसेक दिवसांचा उपवास संपवून लोकं दारू खरेदीसाठी बाहेर पडतील तेव्हा अनेकांची अवस्था ही भुकेल्या लांडग्यासारखीच असेल. मागील साधारण ३५ दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात चोऱ्या-माऱ्या, दरोडे असे गुन्हे घडले नाहीत, पण मुंबई-ठाणे आणि अन्यत्र जे काही दरोडे पडले ते वाईन शॉपवरच, जी लूटमार झाली ती वाईन शॉपचीच. राज ठाकरे यांनी एक गोष्ट स्पष्ट केली. त्यांनी पोळी-भाजी केंद्र व दारू दुकाने सुरू करा असे एकाचवेळी सांगितले, पण दारू (दवा-दारू म्हणा) पोळी-भाजीप्रमाणे जीवनावश्यक वस्तू असल्याचे त्यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे. मोठा वर्ग ज्याप्रमाणे ‘राईस-प्लेट’वर अवलंबून आहे तितकाच तो ‘क्वार्टर’, ‘पेग’वरही अवलंबून असल्याची बहुमोल माहिती सरकारसमोर मांडली आहे.
हेही वाचा - राज ठाकरेंचा सल्ला केंद्राने ऐकला? गृह मंत्रालयाने दिली ‘ही’ दुकानं उघडायला परवानगी
दुवा देतील
तळीरामांचा मोठा वर्ग तडफडत आहे व त्यांच्या शापाचे धनी होऊ नका अशी चीड व्यक्त करेपर्यंत लोकांची मजल गेली आहे. वाटल्यास दारूच्या प्रत्येक बाटलीवर ‘कोरोना टॅक्स’ लावा असे सुचवून राष्ट्रीय तळीराम संघटनेने सरकारी तिजोरीचा विचार केला आहे. त्या सगळय़ांचे दु:ख आता राज ठाकरे यांनी वेशीवर टांगले. राज ठाकरे यांनी दीनदुबळय़ांचे, शोषितांचे, कोरडवाहूंचे दु:ख सरकारसमोर मांडले. त्यांना याकामी दुवा देणारा एक वर्ग नक्कीच असेल. बाकी सर्व भार सरकारवर.