भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अहमदाबादमध्ये भेट झाली असून त्यांच्यात चर्चाही झाली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणेदेखील त्यावेळी अहमदाबादमध्येच उपस्थित होते अशी माहिती सुत्रांनी दिली. मात्र अहमदाबादहून मुंबईत परतल्यानंतर.नारायण राणे यांनी मी अहमदाबादमध्ये भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो नाही, असे सांगितले आहे. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, माझ्या बद्दल ज्या बातम्या पसरविल्या जात आहेत. मला बदनाम करण्यात येत आहे. या सगळ्या अफवा असल्याचे राणे म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे पक्षांतर्गत कुरघोडींमुळे नाराज असून पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं बोलंल जात होतं. त्यातच योगायोगाने हे तिन्ही नेते एकाच वेळी अहमदाबादमध्ये उपस्थित असल्याने चर्चेला बळ मिळालं आहे. 'राणेंच्या निर्णयामुळे खूप लोकांचे आयुष्य बनणार, बिघडणार आहेत, तसेच नारायण राणेंच्या निर्णयाने राजकारणात चढउतार येतील, असं वक्तव्य काँग्रेसचे आमदार आणि राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी सोमवारी सिंधुदुर्गमध्ये केलं होतं.
संबंधित बातम्या - नारायण राणे पु्न्हा दिल्ली दरबारी
नारायण राणे यांनी शिवसेना सोडली नसती तर, राज्याचे राजकारण काही वेगळे असतं. तसेच राजकारणात आणि क्रिकेटमध्ये कधीही काहीही घडू शकतं, अस वक्तव्य रविवारी नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात राणे यांचे परममित्र नितीन गडकरी यांनी केलं होतं. याच कार्यक्रमाच्या वेळी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नारायण राणे यांच्याबद्दल खात्री व्यक्त केली की, नारायण राणे हे वेडावाकडा विचार करणारे नाहीत.
काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षातील काही जणं त्यांच्या विरोधात अफवा पसरवत असल्याचा खुलासा केला होता. मात्र बुधवारी झालेल्या या बैठकीनंतर नारायण राणे यांच्या पक्षांतरावर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.
भाजपकडून जुनीच ऑफर होती, त्यांना हो ही बोललो नाही आणि नाहीही बोललो नाही. सर्व पक्षांकडून ऑफर येत होत्या. तसेच रामदास आठवले यांनी दिलेली ऑफर देखील आपण स्वीकारली असती, त्यामुळे आज आपण केंद्रीय मंत्री झालो असतो, मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणेनी असं वक्तव्य केलं.
अहमदाबादच्या 'ग्रँड हयात' हॉटेलमध्ये वैयक्तिक बैठक होती, अमित शहांच्या घरी गेलो म्हणता, मग तिथून बाहेर पडताना वगैरे व्हिडिओ आहे का? रात्री साडेदहानंतर कुठेही जात नाही, त्यामुळे त्यांना भेटण्याचा प्रश्नच नाही, असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले.
मार्केटमध्ये चांगला माल असेल, तर सगळे विचारतातच. मुख्यमंत्र्यांना अधिवेशनाच्या काळात दोनदाच भेटलो. भाजपामध्ये जाण्याचा प्रस्ताव नाही आणि चर्चाही नाही. राहुल गांधींबरोबर अर्धा तास चर्चा झाली. त्यांच्याकडे काही तक्रार केली होती. तक्रारीचे निवारण झाले नाही. पण आजही तक्रार कायम आहे, असे नारायण राणे यांनी सांगितलं.