पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचं मतदान पार पडलं असलं, तरी राजकीय नेत्यांची बेताल वक्तव्य काही केल्या थांबताना दिसत नाहीत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एकमेकांवर चिखलफेक करणाऱ्या राजकीय नेत्यांनी आता थेट निवडणूक आयोगावरच टीका करण्यास सुरूवात केली आहे. टीका करताना नेत्यांची जीभ कशी घसरते याचं उत्तम उदाहरण नुकतंच समोर आलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पालघर निवडणुकीसंदर्भात बुधवारी ट्विट करत निवडणूक आयोगासाठी चक्क 'तवायफ' हा शब्द वापरला आहे.
पालघर पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मतदानाआधी पैशांचं वाटप करणाऱ्या भाजपाच्या काही कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडलं. या प्रकरणी शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. या तक्रारीनुसार पैसे वाटप करणाऱ्यांविरोधात कारवाई व्हायला हवी होती. पण अद्यापपर्यंत निवडणूक आयोगाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही.
ही कारवाई होत नसल्यानं संतप्त झालेल्या राऊतांनी एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये निवडणूक आयोग भाजपाविरोधातील तक्रारींविरोधात कारवाई करत नसल्याचं म्हटलं आहे. यापुढं जात राऊत यांनी निवडणूक आयोग राजकीय पक्षांसाठी तवायफसारखं काम करत असल्याचं म्हटलं आहे.
Our people caught BJP workers red handed distributing money during Palghar bypoll, but Election Commission did not take any action, if similar inaction is shown by EC all over India, then it means EC is acting like a 'Tawaif'(Mistress) of a political party: Sanjay Raut,Shiv Sena pic.twitter.com/rEcZRQiFhu
— ANI (@ANI) May 30, 2018
यासंबंधी प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी भाजपा आणि भाजपाच्या कामावर जनता प्रचंड नाराज असल्याचं सांगतिलं. भाजपाच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते तक्रार नोंदवण्यासाठी जेव्हा निवडणूक आयोगाकडे गेले, तेव्हा निवडणूक आयोगाने ४ ते ५ तास आमची तक्रारच नोंदवून घेतली नाही. सर्व पुरावे नष्ट केल्यानंतर कुठं आमची तक्रार कागदावर नोंदवून घेतली, असा आरोप राऊत यांनी केला.
एकीकडं ही परिस्थिती तर दुसरीकडं ज्या भागात शिवसेनेला चांगली मत पडण्याची शक्यता होती त्याच भागातील ईव्हीएम मशिन खराब झाल्या. त्याला कारण काय दिलं तर तापमानाचं. या सर्व घटना आणि निवडणूक आयोगाचं वागणं लक्षात घेता निवडणूक आयोग एका राजकीय पक्षासाठी तवायफासारखंच काम करतंय असा पुनरूच्चारही त्यांनी केला.
हेही वाचा-
'पालघरमध्ये एका रात्री इतकी मतं वाढली कशी?' - शिवसेना
'आरएसएस'ही देणार इफ्तार पार्टी!