शिवसेना आणि भाजपा पुढील निवडणूक एकत्र लढवणार, असा दावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केल्यानंतर अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं. मात्र युतीच्या या साऱ्या चर्चा शिवसेना मंत्री आणि प्रवक्त्यांनी धुडकावून लावल्या आहेत. शिवसेना काय निर्णय घेईल, हे अधिकार केवळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आहेत, असं रामदास कदम यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.
उत्तर प्रदेशमधील निकलानंतर पराभवाचं भूत भाजपच्या मानगुटीवर बसलं आहे. त्यामुळे मुनगंटीवार अशी वक्तव्य करत आहेत, असा खुलासा करत शिवसेनेच्या वरिष्ठांनी आधीच युतीची शक्यता नाकारल्याचं कदम यांनी स्पष्ट केलं. सोबतच ''आम्ही आधीच स्पष्ट केलं आहे की, आम्ही एकटं लढू आणि विधानसभेवर भगवा फडकवू, त्यामुळे हा निर्णय शिवसेनेने आधीच घेतला आहे. भाजपाने आता युतीची स्वप्नं पाहू नये. कारण तुम्ही आमच्या टेकूवर तुम्ही आहात'', असा टोलाही कदम यांनी भाजपाला लगावला.
''सेना स्वबळावर निवडणूक लढविणार असून सत्ता स्थापन करणार यात शंका नाही. सेनेच्या टेकूवर भाजपाची सत्ता असल्याने आता भाजपचा नाईलाज झाला आहे. सत्तेत राहून भाजप आम्हाला काय वागणूक देत आहे हे संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय आणि हे आम्ही कदापी विसरणार नाही'', असं कदम भाजपाला उद्देशून म्हणाले.
मुनगंटीवार हे काही शिवसेनेचे प्रवक्ते नाहीत. त्यामुळे त्यांनी शिवसेनेची भूमिका जाहीर करू नये, असंही शिवसेनेच्या प्रवक्त्यांकडून जाहीर करण्यात आलं.
हेही वाचा-
शिवसेनेचा भाजपाला दम, २०१९ ची निवडणूक स्वबळावर लढणार
शिवसेना दिवाळीपूर्वीच फोडणार फटाका?
तर, शिवसेना शिवाजी महाराजांच्या डोक्यावर छत्र उभारेल- उद्धव ठाकरे