Advertisement

Hotel & Restaurant: राज्यात लवकरच सुरू होणार हाॅटेल व्यवसाय- उद्धव ठाकरे

महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसायात हॉटेल उद्योगाचं मोठं स्थान आहे, हे लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा सुरु करण्यासाठी राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार केली आहे.

Hotel & Restaurant: राज्यात लवकरच सुरू होणार हाॅटेल व्यवसाय- उद्धव ठाकरे
SHARES

महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसायात हॉटेल उद्योगाचं मोठं स्थान आहे, हे लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा सुरु करण्यासाठी राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार केली आहे. ही कार्यपद्धती अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करता येतील, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली. यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, पर्यटन प्रधान सचिव वल्सा नायर सिंह सहभागी होते.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत आपण राज्यात अनेक उद्योग व्यवसाय सुरु केले आहेत. मुंबई व शहरांतील सर्व हॉटेल्स कोरोना युद्धात सरकारबरोबर आहेत. पर्यटन व्यवसायातील महत्त्वाचा उद्योग असलेली हॉटेल्स तसंच  लॉजेस सुरु करण्यापूर्वी खूप काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल. आपली जबाबदारी दुहेरी आहे. हॉटेल्समध्ये येणारा प्रत्येक अभ्यागत, प्रवासी निरोगी असेल यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी करावी लागेल. कारण एक कोविड पॉझिटिव्ह  व्यक्ती हॉटेलमध्ये आला तरी सर्व हॉटेल व कर्मचारी आजारी पडू शकतात. आपण सलूनला परवानगी दिली असली, तरी केवळ केस कापणे व हेअर डायसाठी. जिमदेखील अजून बंदच ठेवले आहेत. कारण आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे.

हॉटेल्स सुरु करायला काही अडचण नाही. मात्र राज्य शासनाने आखून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे आपल्याला नियमांचं पालन करावं लागणार आहे. हॉटेल व्यवस्थापनांनी त्यांच्याकडे काम करत असलेले कामगार, कर्मचारी यांना काढू नये. आपण निश्चितच यातून मार्ग काढू. या संकटकाळात कामगार संघटना देखील अवाजवी मागण्या करणार नाहीत, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. 

हेही वाचा- सरकार ‘ही’ औषधं मोफत वाटण्याच्या विचारांत- उद्धव ठाकरे

स्वयंशिस्त महत्त्वाची 

हॉटेल उद्योग हा पर्यटन व्यवसायासाठी खूप महत्त्वाचा आहे. नाईट लाईफला देखील आपण प्रोत्साहन दिलं कारण पर्यटन व्यवसाय हा राज्याच्या विकासाला उत्तेजन देऊ शकतो हे आपल्याला माहीत आहे. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद व इतर मोठ्या  शहरांत आम्ही सगळे व्यवहार सुरु करताना भविष्यातील  वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन जम्बो सुविधा वाढवण्यावर भर दिला आहे. या सगळ्या प्रयत्नांत हॉटेल्सनी आमच्या वैद्यकीय तसंच शासकीय यंत्रणांसाठी खूप मदत केली. कोरोनानंतर हॉटेल उद्योग परत जोमाने पायावर उभा राहिला पाहिजे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या उद्योगाने स्वयंशिस्तीसाठी स्वत:ला  नियम घालणं महत्त्वाचं आहे, असं पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.

हॉटेल्स उद्योग लगेच १०० टक्के सुरु करता येणार नाही. पण टप्प्याटप्प्याने, सर्व काळजी घेऊन सुरु करण्याचे नियोजन आम्ही करत आहोत. हॉटेल्स सुरु करताना काटेकोर नियमांची आखणी करावी लागेल. हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणावर सुविधांचा वापर निवास, जेवण्याखाण्यासाठी केला जातो. त्यामुळे आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागेल. प्रत्येक ठिकाणी सरकारला या नियमांची पूर्तता होते किंवा नाही हे पाहणं शक्य होणार नाही यासाठी स्वयंशिस्त ठेवणं गरजेचे आहे, असं मुख्य सचिव संजय कुमार म्हणाले.

इंडियन हॉटेल्स असोसिएशनचे गुरुबक्ष सिंग कोहली म्हणाले,  या उद्योगाला आता खेळतं भांडवल आवश्यक आहे. शासनाने आम्हाला देखील कोरोना योद्धा म्हणून पाहावं. सर्वत्र नोकऱ्या जात आहेत. मात्र आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांच्या घरी चुली पेटलेल्या राहतील याची काळजी घेत आहोत. आमच्याकडे ८० टक्के स्थलांतरित कामगार आहे. काही प्रमाणात हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरक्षित अंतर ठेवून सुरु करायला परवानगी द्यावी, इतर राज्यांशी आपली स्पर्धा असते. त्यामुळे पर्यटकांनी जास्तीत जास्त काळ महाराष्ट्रात, मुंबईत राहावे जेणेकरून पर्यटन उद्योगाला वाव मिळेल.

विवेक नायर म्हणाले की,  वीजेची देयके कमी करावीत. हॉटेल्सना औद्योगिक दरात पाणी आणि वीज उपलब्ध करून द्यावं. कमलेश बारोट म्हणाले, या उद्योगाला खुले केल्यास अनेक फायदे होतील. हॉटेल्स आणि रेस्टॉरंटच्या खुल्या जागेत व्यक्तींच्या संख्येवर कमीतकमी मर्यादा असावी अन्यथा उत्पन्न आणि कर मिळणार नाही.  हॉटेल्स आणि रेस्टॉरंटबाबत वेळेची मर्यादा वाढवून द्यावी. सध्या ६ लाख कोटींपेक्षा जास्त फटका  हॉटेल्स आणि रेस्टोंरंट उद्योगाला बसत आहे. विमान सेवा मर्यादित प्रमाणात सुरु झाली आहे. फ्लाईटमध्ये प्रवाशांना ८ -८ तास एकत्र बसावं लागतं. हॉटेल्समध्ये एखादं कुटुंब सर्व प्रकारची काळजी घेऊन आणि सुरक्षितता ठेवून येऊ शकतं. टेबल्सची मांडणी त्यादृष्टीने केल्यास, स्वच्छता ठेवल्यास काहीही अडचणी येणार नाही. देवेंद्र भरमा, प्रदीप शेट्टी, हरप्रीत सिंग, तेज टकले यांनीदेखील आपल्या सूचना मांडल्या.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा