विधानपरिषदेची निवडणूक आता बिनविरोध होणार, हे जवळपास निश्चित झालं आहे. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे उमेदवार पृथ्वीराज देशमुख यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता मैदानात ११ जागांसाठी केवळ ११ उमेदवारच राहिले आहे. त्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होईल, असं संसंदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केलं.
महादेव जानकर यांनी भाजपची उमेदवारी न घेता रासपच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी कोण माघार घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र ही निवडणूक बिनविरोध करायची असल्यानं खुद्द मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरूनच देशमुखांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची चर्चा आहे.
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १६ जुलैला निवडणूक होणार होती. ११ जागांसाठी भाजपचे उमेदवार पृथ्वीराज देशमुख यांनी १२ वा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं निवडणुकीची चुरस वाढली होती. मात्र आज देशमुख यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं ही निवडणूक बिनविरोध होण्याचे सर्व मार्ग मोकळे झाले आहे. आता फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे.
रासपचे उमेदवार आणि पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, भाजपचे विजय गिरकर, राम पाटील रातोळीकर, रमेश पाटील आणि निलय नाईक, शिवसेनेचे अॅड. अनिल परब, मनीषा कायंदे, शेकापचे जयंत पाटील, काँग्रेसचे शरद रणपिसे, वजाहत मिर्झा आणि राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी हे बिनविरोध निवडून विधानपरिषदेवर जाणार, हे निश्चित झाले आहे.
हेही वाचा -
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ अर्ज
१६ जुलैला मुंबईचं दूध रोखणारच - राजू शेट्टी यांचा इशारा