Advertisement

भाजपकडून शिवसेना आमदाराला ५० कोटींची आॅफर, वडेट्टीवार यांचा खळबळजनक आरोप

राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच अधिकच वाढल्याने भाजपकडून आमदारांना फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने होत आहे.

भाजपकडून शिवसेना आमदाराला ५० कोटींची आॅफर, वडेट्टीवार यांचा खळबळजनक आरोप
SHARES

राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच अधिकच वाढल्याने भाजपकडून आमदारांना फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने होत आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपने शिवसेना आमदाराला फोडण्यासाठी ५० कोटी रुपयांची आॅफर दिल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. त्यामुळे एका बाजूला शिवसेनेने दक्षता घेत आपल्या सर्व आमदारांना वांद्र्यातील रंगशारदा हाॅटेलमध्ये ठेवलेलं असताना काँग्रेसने आपल्या आमदारांना राजस्थानातील जयपूर इथं हलवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

पेच कायम

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १५ दिवस झाले तरीही सत्ता स्थापनेचा पेच सुटलेला नाही. विद्यमान १३ व्या विधानसभेचा कार्यकाल ८ नोव्हेंबरला शुक्रवारी मध्यरात्री संपत आहे. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदासह सत्तेतील निम्म्या वाट्याचं लेखी आश्वासन जोपर्यंत भाजपकडून मिळत नाही. तोपर्यंत भाजपसोबत चर्चा करायलाही  शिवसेना तयार नाही. तर भाजपही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठीचा दबाव वाढवण्यासोबत इतर पक्षातील आमदार फोडायचा भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील भाजपकडून फोडाफोडीचं राजकरण्याचा प्रयत्न होत असल्याचं सांगितलं होतं.

हेही वाचा- महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शक्यता किती? राज्यपालांनी घेतली महाधिवक्त्यांची भेट

५० कोटींची आॅफर 

शिवसेना आमदाराला भाजपाने ५० कोटीची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तर सत्तेचं समीकरण जुळवून आणण्यासाठी आमच्या काही आमदारांना भाजपकडून फोन येत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. 

शिवसेनेसोबत काँग्रेसच्या आमदारालाही भाजपकडून ऑफर देण्यात आली. पण आमचे आमदार फुटणार नाहीत याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. भाजपाने एकदा समोर येऊन सांगावं की आम्ही सत्ता स्थापन करु शकत नाही. दुसऱ्यांना संधी द्या. स्वतः सरकार स्थापन करायचं नाही आणि दुसऱ्याला संधी द्यायची नाही. भाजपाकडून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणण्याचा डाव सुरु आहे. तसं केल्यास ते पाप भाजपाचं असेल, असंही वडेट्टीवार म्हणाले.   

काँग्रेसची बैठक

शेवटच्या दिवशी आमदार फोडण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता असल्याने काँग्रेसने काही आमदारांना राजस्थानमधील एका सुरक्षित स्थळी रवानाही केल्याचं समजत आहे. दरम्यान काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक होत असून या बैठकीत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा द्यायचा किंवा नाही, यावर निर्णय घेण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 



हेही वाचा-

शिवसेनेला फोडाफोडीची भीती, सर्व आमदारांचा रंगशारदा हाॅटेलमध्ये मुक्काम

आमच्या आमदारांना भाजपकडून फोन, काँग्रेस, राष्ट्रवादीचा खळबळजनक आरोप



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा