भाजपकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना फोडण्यासाठी आमिषं दाखवण्यात येत असल्याचा आरोप होत असताना शिवसेनेने कुठलाही धोका नको म्हणून सर्वांना वांद्र्यातील रंगशारदा हाॅटेलमध्ये हलवलं आहे. काही महिन्यांपूर्वी याच प्रकारे कर्नाटकातील आमदारांना पवईतील रेनिसन्स हाॅटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं.
अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदासाठी भाजपबरोबर कलगीतुरा सुरू असताना शिवसेनेने आपल्या सर्व निर्वाचीत आमदारांची बैठक गुरूवारी दुपारी बोलवली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मातोश्री इथं झालेल्या बैठकीत शिवसेनेचा मुख्यमंत्री होणारच याचा पुनरूच्चार उद्धव ठाकरे यांनी केला. तसंच आमदारांनी महायुतीबाबत निर्णय घेण्याचे सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांना एकमताने दिले.
हेही वाचा- भाजपकडून राष्ट्रपती राजवट लादण्याचं पाप सुरू, संजय राऊत यांची टीका
यानंतर सर्व आमदारांना हाॅटेल रंगशारदामध्ये हलवण्यात आलं. भाजपकडून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांना फोडण्याचे प्रयत्न होत असल्याचं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. त्यावर शिवसेना आमदार फुटतील या भीतीने त्यांना हाॅटेलमध्ये हलवण्यात येणार आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना ही केवळ अफवा असून शिवसेना आमदारांना फोडण्याची कुणाचीही हिंमत नाही, या आमदारांच्या वाऱ्यालाही कुणी उभं राहू शकत नाही, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला होता.
परंतु पक्षप्रमुखांच्या निवासस्थानापासून जवळ असलेल्या हॉटेलमध्ये सर्वांना हलवण्यात आल्याने राजकीय घोडेबाजारात कुठल्याही आमदाराने दगा देऊ नये, यासाठी ही दक्षता घेतल्याचं म्हटलं जात आहे.
यासंदर्भात शिवसेना आमदार गुलाबराव पाटील म्हणाले की, पुढील दोन दिवसांसाठी आम्ही सर्वजण रंगशारदा हाॅटेलमध्ये थांबणार आहोत. रंगशारदा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानापासून जवळ असल्याने जेव्हाही आवश्यकता असेल, तेव्हा आमदारांना तिथं सहजपणे पोहाचता येईल. सत्तास्थापनेबाबत शिवसेना पक्षप्रमुख जो निर्णय घेतील, तो निर्णय आम्हाला मान्य असेल.
महाराष्ट्रातील राजकीय घोडेबाजाराच्या सिनेमाला आताकुठे सुरूवात झाली आहे. अजून तर या सिनेमाचा क्लायमॅक्स बाकी आहे.
हेही वाचा-
आमच्या आमदारांना भाजपकडून फोन, काँग्रेस, राष्ट्रवादीचा खळबळजनक आरोप
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शक्यता किती? राज्यपालांनी घेतली महाधिवक्त्यांची भेट