विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजप-शिवसेना महायुतीला कौल दिला. परंतु निकाल लागून १३ दिवस उलटून गेले तरी कुठल्याही पक्षाकडून सत्ता स्थापनेसाठी दावा करण्यात आलेला नाही. यामुळे राज्यात घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्याचे महाधिवक्ता (अॅटर्नी जनरल) आशुतोष कुंभकोणी यांना राजभवन इथं बोलवून त्यांच्यासोबत चर्चा केली.
विद्यमान विधानसभेचा कालावधी शुक्रवारी ८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजता संपुष्टात येत आहे. त्याआधी कुठल्याही पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा न केल्यास कुठला निर्णय घ्यायचा, यावर राज्यपालांनी कुंभकोणी यांच्याशी चर्चा केली. तसंच कायद्यातील तरतूदींची माहिती घेतली.सद्यस्थितीत भाजप १०५ जागांसह राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर शिवसेनेकडे ५८ जागांचं संख्याबळ आहे. दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन बहुमताचं सरकार स्थापन करणं अपेक्षित असलं, तरी दोन्ही पक्षांमध्ये सत्ता वाटपावरून सुरू असलेला कलगीतुरा संपलेला नाही. त्यातच शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस (५६) आणि काँग्रेस (४३) ला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार असं म्हटलं जात आहे. परंतु या दोन्ही पक्षांनी विरोधात बसण्याची भूमिका घेतल्याने सत्ता स्थापनेचा पेच वाढलेला आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा राज्यपालांच्या निर्णयाकडे लागल्या आहेत.
हेही वाचा-
भाजपकडून राष्ट्रपती राजवट लादण्याचं पाप सुरू, संजय राऊत यांची टीका
ज्या पक्षाकडे १४५ आकडा असेल त्यांनी आपलं सरकार बनवावं- संजय राऊत