पर्यटनाच्या दृष्टीने पालघर जिल्ह्याची भौगोलिक रचना अनुकूल असून जिल्ह्याला विस्तीर्ण सागर किनारा लाभला आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटनस्थळाचा विकास करणं आवश्यक असल्याने पर्यटन विकासाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी उद्धव ठाकरे (palghar) म्हणाले, नव्याने जिल्हा अस्तित्वात आल्याने जिल्ह्यासाठी लागणाऱ्या आवश्यक सुविधा निर्माण करण्यात आहेत. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसंच जिल्हा परिषदेच्या इमारतीचं काम लवकरच पूर्ण होऊन नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. कुपोषण पूर्णपणे थांबविण्यावर भर देण्यात येत आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधत आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणून पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
हेही वाचा- लोकल प्रवासामुळे कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ? आरोग्यमंत्री म्हणाले...
जव्हार तालुक्यातील जामसर प्राथमिक आरोग्य केंद्राची देखील उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी पाहणी केली. प्रवेशद्वारावर असलेल्या फळ्यावर लिहिलेल्या हस्ताक्षराबद्दल त्यांनी विचारणा केली. सर्व वैद्यकीय कक्षाची पाहणी झाल्यानंतर विविध रंगात काढलेल्या रांगोळीतील बाळासाहेब ठाकरे यांचं चित्र पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आनंदित झाले. चित्रकार राहुल श्रीराम सहाने या विद्यार्थ्यासोबत आलेले कलाशिक्षक प्रवीण अवतार यांचीही त्यांनी चौकशी केली. पालघर जिल्ह्यातील वारली चित्रकला अधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यातील चित्रांना संकल्पना देऊन विविध रंगात रंगविण्यात यावी यासाठी मुलांचे लहान गट करण्यात यावेत तसंच ही कला नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. रांगोळी कला ही चित्रकलेपेक्षा कठीण असून त्यात खूप मेहनत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
(maharashtra cm uddhav thackeray visits palghar district)