मुख्यमंत्री कार्यलयाच्या (cmo) अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यानंतर हे ट्विट तातडीने डिलिट करण्यात आलं. परंतु या परस्पर झालेल्या नामांतरावर संताप व्यक्त करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेला (shiv sena) किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिली. तसंच नामांतराला ठाम विरोध असल्याचंही ठणकावून सांगितलं.
मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यानुसार वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या खात्याबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून सायंकाळी ६ वाजता एक ट्विट करण्यात आलं. या ट्विटमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला होता. विशेष म्हणजे या ट्विटमध्ये काँग्रेसचेच मंत्री अमित देशमुख यांचा फोटो वापरण्यात आला होता. या ट्विटची चर्चा सुरू होताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांनी तातडीने ३ ट्विट करत आपला संताप व्यक्त केला.
हेही वाचा- औरंगाबाद विमानतळाचं नामकरण छ.संभाजी महाराज करा- उद्धव ठाकरे
महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला काँग्रेसचा (congress) ठाम विरोध आहे.
महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) January 6, 2021
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (@MahaDGIPR) शहरांचं परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचं भान बाळगावं. शहरांचे नामांतरण करणं हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही.
छत्रपती संभाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया, असे खडे बोल बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेला सुनावले.
दुसरीकडे, औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलण्यावरून राजकारण तापलेलं असतानाच औरंगाबाद विमानतळाचं छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं नामकरण करण्यासाठी लवकरात लवकरात अधिसूचना काढावी, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.
(maharashtra congress president balasaheb thorat warns shiv sena on name change issue of aurangabad)