राज्य सरकारने केलेल्या फेरपडताळणीत मुंबईसह राज्यभरात १३२८ आणखी कोरोनामृत्यू आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा वाढून आता ५४५६ इतका झाला आहे. त्यावर सरकारला लक्ष्य करत मागील ३ महिन्यांपासून कोरोनाबाधितांचे आकडे लपवणाऱ्यांवर काय कारवाई करणार ? (opposition leader devendra fadnavis demands to take action against who hide corona death tally in mumbai and maharashtra ) असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.
राज्य सरकारच्या फेरपडताळणीत कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे आकडे वाढल्यानंतर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, अखेर सत्य पुढे आलंच आहे. मुंबईत ८६२ आणि अन्य जिल्ह्यांतील ४६६ कोरोना मृत्यू सरकारने मंगळवारी जाहीर केले.
असे एकूण १३२८ मृत्यू हे अधिकचे कोरोना मृत्यू म्हणून आता नोंदले जातील. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, या प्रक्रियेला आकड्यांच्या फेरपडताळणीचं गोंडस नाव न देता, गेले ३ महिने ही आकडेवारी लपविणार्यांवर काय कारवाई करणार, हे सांगितलं गेलं पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई ही झालीच पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारकडे केली आहे. फडणवीस आणि भाजपचे इतर नेते सातत्याने राज्य सरकार कोरोनाबाधितांचे आकडे लपवत असल्याचा आरोप करत आहेत. फेरपडताळणीत वाढलेल्या आकड्यांमुळे आता विरोधकांच्या आरोपांना धार आली आहे. तसंच सरकारवर कडी करण्यासाठी हाती आयतं कोलीत देखील मिळालं आहे.
हेही वाचा - धक्कादायक! फेरपडताळणीत मुंबईसह राज्यात १३२८ आणखी कोरोनामृत्यू
And the truth finally is out...!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 16, 2020
862 #COVID19 deaths in Mumbai and 466 in other districts were declared today.
Total 1328 additional deaths will now be recorded as #Covid_19 deaths. pic.twitter.com/mi7Hle3VS2
वाढलेल्या आकड्यांमध्ये अहमदनगर १, अकोला १४, अमरावती ६, औरंगाबाद ३३, बुलढाणा २, धुळे १२, जळगाव ३४, जालना ४, लातूर ३, नांदेड २, नाशिक २८, उस्मानाबाद ३, पालघर ११, परभणी १, पुणे ८५, रायगड १४, रत्नागिरी १, सांगली ४, सातारा ६, सिंधुदूर्ग ३, सोलापूर ५१, ठाणे १४६, वाशिम १, यवतमाळ १ अशी एकूण ४६६ तसंच मुंबईतील ८६२ कोरोनाबाधितांचे मृत्यू धरून एकूण आकडा १३२८ असा आहे.
राज्य शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे मार्च, २०२० पासून कोविड-१९ प्रकरणाची पडताळणी करण्यात येत असून त्यानुसार समायोजन करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या निर्देशानुसार ११ जून रोजी राज्य शासनाने जिल्हा यंत्रणांना समायोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
कोविड-१९ रुग्णासंदर्भातील माहिती विविध जिल्ह्यातील रुग्णालयांमधून पोर्टलवर भरण्यात येते. राज्य शासन या माहितीची स्वत:हून फेरतपासणी करते. समायोजन केलेली माहिती ही वेबपोर्टलवर सार्वजनिक केली जाते. त्यामुळे आकडेवारीत वाढ दिसली तरी हेतूबाबत शंका घेण्याचे कारण असू नये, असं राज्य शासनाने स्पष्ट केलं आहे.