कांदिवली पश्चिम येथील एमजी रोडवरील ‘राजूभाई ढोकलावाला’ या दुकानाच्या पाटीची मनसेकडून तोडफोड करण्यात आली होती. ही पाटी गुजराती भाषेमध्ये असल्याने मनसे कार्यकर्त्यांनी या विभागातील अनेक दुकानांवरील गुजराती पाट्यांना काळे फासले आणि तोडफोड केली. मनसेच्या या गुंडागर्दीचा आपण निषेध करत असून मनसेचा हा मार्ग चुकीचा असल्याचं मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी म्हटलं आहे.
मुंबईतील सर्व वर्गांना सरंक्षण मिळाले पाहिजे आणि ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये लक्ष घालून हा सगळा प्रकार ताबडतोब थांबवावा, अशी मागणी त्यांनी केली. मनसे जातीयवाद निर्माण करत असून याआधी उत्तर भारतीय आणि आता गुजराती लोकांना मनसे टार्गेट करून जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोपही संजय निरूपम यांनी यावेळी केला.
काँग्रेस मराठी पाट्यांच्या विरोधात नाही. मात्र, दुकानावरील पाट्या इंग्रजी, मराठी आणि हिंदीतून असाव्यात असा खूप जुना कायदाच आहे. कोणी अन्य कोणत्या भाषेत पाटी लावत असेल, तर मुंबई महानगरपालिका आणि शासन त्यावर कारवाई करेल. शासनामध्ये शिवसेना आणि भाजपचेच सरकार आहे. त्यांनी कारवाई करावी. कारण ती सरकारची जबाबदारी आहे. मनसेला हा अधिकार कोणी दिला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा
कांदिवलीतला 'ढोकळा’वाला नरमला, मनसेच्या आंदोलनाचा दणका