काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्यासोबत आमचे उत्तम संबंध आहेत. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांच्या मनात जे आहे, ते राहुल गांधी यांच्या मनात नक्कीच नाही, असा विश्वास शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी हे मत व्यक्त केलं. (shiv sena mp sanjay raut comment on rahul gandhi leadership)
महाविकास आघाडीच्या स्थापनेच्या प्रक्रियेत राहुल गांधी यांचाही सहभाग होता. त्यांनी सखोल चर्चा करूनच महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यास होकार दिला होता. काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुन्हा त्यांची निवड झाली आणि त्यांनी सरकारमधून बाहेर पडण्याच्या सूचना केल्यास आम्ही सत्तेतून बाहेर पडू, असं वक्तव्य काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं.
तसंच काँग्रेसमधील ५ माजी मुख्यमंत्र्यांसह २३ वरिष्ठ नेत्यांनी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाच्या वाढीसाठी नेतृत्वासह सर्वच पातळ्यांवर मोठे बदल करण्याची मागणी केली होती. या पत्रानंतर काँग्रेस कार्य समितीची (CWC) बैठक बोलवण्यात आली. या बैठकीत सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात यावं, अशी मागणी काँग्रेस कार्यकारी समितीकडे केली.
हेही वाचा - ‘हे’ तर राहुल गांधीचं नेतृत्व बोथट करण्याचं षडयंत्र, काँग्रेस नेत्याचा दावा
त्यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस पक्ष आजही देशातील प्रमुख विरोधी पक्ष आहे. गावागावात या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. फक्त पक्षाची ताकद कमकुवत झाली असून पक्षातील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतील मतभेद हा त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे. हे मतभेद संपवून पुढं जाण्याची गरज आहे.
काँग्रेसचं नेतृत्व गांधी कुटुंबाबाहेरील कोणीतरी करावं ही मागणी सध्याच्या स्थितीत योग्य वाटत नाही. कारण काँग्रेस पक्षाला पुढे घेऊन जाऊ शकेल, असा एकही व्यक्ती सध्या तरी दिसून येत नाही. राहुल गांधी यांच्यात नेतृत्वाची क्षमता आहे. त्यांच्या नेतृत्वामुळंच राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये काँग्रेसला सत्ता मिळाली. गांधी कुटुंब हेच काँग्रेसचं आधार कार्ड आहे. हे इतर नेत्यांनी समजून घेण्याची गरज आहे, असंही संजय राऊत म्हणाले.