काँग्रेच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी लिहिलेलं पत्र म्हणजे काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचं नेतृत्व बोथट करण्यासाठी रचलेलं षडयंत्र आहे, असा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते आणि माजी खासदार संजय निरूपम यांनी केला आहे. (letter conspiracy against congress mp rahul gandhi says sanjay nirupam)
आपल्या ट्विटर हँडलवरुन संजय निरूपम यांनी हे आरोप केले आहेत. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय की, हे पत्र म्हणजे राहुल गांधी यांचं नेतृत्व बोथट करण्यासाठी रचलेलं षडयंत्र आहे. जे षडयंत्र आधी बंद खोलीत रचलं जायचं ते आता पत्राच्या माध्यमातून समोर आलं आहे. या मागचं एकच कारण आहे की, राहुल गांधी यांनी अध्यक्ष बनण्याची आपली जिद्द सोडून द्यावी आणि जेणेकरून राज्यातील काँग्रेसची ढासळती भिंत वाचवता येईल. परंतु केवळ तेच काँग्रेसला वाचवू शकतात.
आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय की, सोनिया गांधी यांनी राजीनामा का द्यावा? या उलट काँग्रेस कार्यकारिणीतील (CWC) सदस्य राजीनामा देऊन बाजूला का होत नाहीत? २०१९ मधील लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारुन राहुल गांधी यांनी राजीनामा दिला होता. मग काँग्रेस कार्यकारिणीतील सदस्यांची काहीच जबाबदारी नाही का? काँग्रेस कार्यकारिणीतील सदस्यांनी आतापर्यंत राजीनामा का नाही दिला? असे प्रश्नही संजय निरूपम यांनी विचारले आहेत.
हेही वाचा - शिवसेना काँग्रेसविरोधात आंदोलन करणार का? आशिष शेलारांचा सवाल
यह पत्र राहुल गाँधी का नेतृत्व भोथरा करने के लिए एक नया षडयंत्र है।
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) August 23, 2020
जो षडयंत्र बंद कमरों में रचा जाता था,वह एक पत्र में उभर कर आया है।
इसका एक ही जवाब है, राहुल जी अध्यक्ष न बनने की जिद्द छोड़ें और राज्यों में कॉंग्रेस की ढहती दीवारों को बचाएँ।
कॉंग्रेस को सिर्फ वही बचा सकते हैं। pic.twitter.com/T0yjaQbr9Q
काँग्रेसमधील ५ माजी मुख्यमंत्र्यांसह २३ वरिष्ठ नेत्यांनी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाच्या वाढीसाठी नेतृत्वासह सर्वच पातळ्यांवर मोठे बदल करण्याची मागणी केली होती. पत्र लिहिणाऱ्या नेत्यांमध्ये गुलाम नबी आजाद, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, कपिल सिब्बल, मनीष तिवारी, शशी थरूर, खासदार विवेक तनखा, AICC आणि CWC चे मुकुल वासनिक आणि जितिन प्रसाद यांचा समावेश आहे.
तसंच माजी मुख्यमंत्र्यांमध्ये भूपिंदरसिंह हुड्डा, राजेंद्र कौर भटट्ल, एम. वीरप्पा मोइली, पृथ्वीराज चव्हाण, पी. जे. कुरियन, अजय सिंह, रेणुका चौधरी और मिलिंद देवडा या नेत्यांचाही यात समावेश आहे. काँग्रेसचे नेते राज बब्बर, अरविंदरसिंह लवली आणि कौल सिंह यांनी या पत्राचे समर्थन केले आहे. अखिलेश प्रसाद सिंह, कुलदीप शर्मा, योगानंद शास्त्री आणि संदीप दीक्षित यांच्या देखील सोनिया गांधींना पाठवलेल्या पत्रामध्ये सह्या आहेत.
या पत्रानंतर काँग्रेस कार्य समितीची (CWC) बैठक बोलवण्यात आली. या बैठकीत सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात यावं, अशी मागणी काँग्रेस कार्यकारी समितीकडे केली आहे.
काँग्रेसमध्ये काही नेते सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदी कायम राहावं, यासाठी आग्रही आहेत. यावरून काँग्रेस नेत्यांमध्ये फूट पडल्याचं दिसून येत आहे.