शिवसेनेनं मुंबई-ठाण्यातील घरांना ५०० चौरस फुटांच्या मालमत्ता करमाफीचं वचन दिलेलं असताना भाजपाने ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी मिळावी, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. हे कुरघोडीचं राजकारण करण्याअगोदर भाजपाने स्वत:च्या ताब्यात असलेल्या महापालिकांमध्ये ७०० चौ.फुटांची करमाफी द्यावी, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ''फुटांचं राजकारण करणाऱ्यांना जनता लवकरच चल फूट'' म्हणेल, अशी प्रतिक्रिया दिली.
मुंबईत ५०० चौरस फुटांपर्यंत घरांना सरसकट मालमत्ता करमाफी आणि ७०० चौरस फुटांपर्यंत घरांना करसवलत देणार असं वचन शिवसेनेने महापालिका निवडणूक वचननाम्यात दिलं होतं. जुलै २०१७ मध्ये या करमाफीचा ठरावही मुंबई महापालिकेने मंजूर केला. मात्र आयुक्तांनी ‘मंत्रालया’च्या दबावाखाली हा प्रस्ताव राज्य सरकारकडे अद्याप पाठवलेला नाही.
त्यावर शिवसेना नगरसेवकांनी बुधवारी महापालिका सभागृहात प्रशासनाला धारेवर धरलं, तर शिवसेना आमदारांनी विधानसभा दणाणून सोडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ७०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्याचा विचार सरकार करीत असल्याची घोषणा केली. त्यावर हे कुरघोडीचं राजकारण असल्याची प्रतिक्रिया सर्वत्र उमटली.
हेही वाचा-
शिवसेनेचा मालमत्ता करमाफीचा प्रस्ताव प्रशासनानेच अडवला
बड्या धेंडांकडे महापालिकेचा ४५०० कोटींचा मालमत्ता कर थकित!