एका बाजूला काँग्रेस कुठल्या ना कुठल्या कारणावरून कुरबुरी करत ठाकरे सरकारवर जाहीररित्या नाराजी दर्शवत असताना भाजपच्या नेत्यांकडूनही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला चिमटे काढले जात आहेत. याचप्रकारे भाजपच्या दिल्लीतील एका नेत्याने काँग्रेसने पाठिंबा काढल्यास भाजपने शिवसेनेला (Subramanian Swamy wants BJP to extend support to Shiv Sena if Congress and NCP back out) पाठिंबा द्यावा, असं म्हणत डिवचलं आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून शिवसेनेला उकसवण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे सरकारचं समर्थन काढलं, तर भाजपने राष्ट्रहिताचा विचार करून ठाकरे सरकारला पाठिंबा द्यावा आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार स्थापन करावं.
काँग्रेसची नाराजी
मागील काही दिवसांपासून काँग्रेस आणि शिवसेना तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू असल्याच्या बातम्या सातत्याने पुढं येत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या कुठल्याही महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत काँग्रेसच्या मंत्र्यांना सहभागी करून घेत नसल्याने काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं म्हटलं जात आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त १२ जागांसाठी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमध्ये खेचाखेची सुरू झाली आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची मुंबईत नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसला विधान परिषदेच्या ४ जागा मिळाल्या पाहिजेत, अशी काँग्रेसची मागणी आहे.
हेही वाचा - नाराजी नव्हतीच, फक्त समानता हवी, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर काँग्रेसचं घुमजाव
If Congi and NCP withdraw support from Uddhav government then in the national interest BJP must extend support and re-form NDA govt in Maharashtra
— Subramanian Swamy (@Swamy39) June 18, 2020
मुख्यमंत्र्यांची भेट
यासंदर्भात चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सरकारच्या प्रत्येक बैठकीत व निर्णय प्रक्रियेत काँग्रेसचा सहभाग होता. काँग्रेसला कोणत्याही बैठकीत डावललं गेलं नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये कुठल्याही प्रकारची नाराजी असण्याचा प्रश्नच नव्हता. केवळ सरकारमध्ये समानता असावी इतकीच आमची अपेक्षा होती.
काही बाबींवर आमचं म्हणणं प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांपुढं मांडण्याची गरज होती, त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. प्रशासकीय अधिकाऱ्याची निवड, विधान परिषदेच्या जागांबाबतही कुठले मतभेद नाहीत, हे देखील थोरात यांनी स्पष्ट केलं.
याच मुद्द्यावरून महाराष्ट्रात तिघाडी सरकारमध्ये बिघाडी झाली आहे. राज्यात काँग्रेसच्या पाठिंब्यावर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलेलं असलं, तरी काँग्रेसला कुठल्याही निर्णयप्रक्रियेत सामील करुन घेतलं जात नसल्याने पक्षात नाराजी आहे. त्यामुळे नाराज काँग्रेसने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा, असा खोचक सल्ला रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला होता.