सरकारी विमान ही कुणाची वैयक्तिक मालमत्ता नाही! राज्यपाल महोदयांना विमानातून खाली उतरवणं, इतका अहंकार महाविकास आघाडी सरकारमध्ये आला कुठून? असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे.
अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे. महाराष्ट्रात (maharashtra) यापूर्वी असा प्रकार घडलेला नाही. राज्यपाल हे व्यक्ती नाही, तर पद आहे. व्यक्ती येतात जातात. खरं म्हणजे राज्यपालाच राज्याचे प्रमुख असतात. राज्यपालच मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ नेमतात असं आपल्या संविधनाने सांगितलं आहे. एक पद्धत अशी आहे की राज्यपालांना जर सरकारी विमान वापरायचं असेल, तर त्यांना ‘जीएडी’ ला एक पत्र पाठवावं लागतं. ‘जीएडी’ त्यानंतर त्यासंदर्भातील परवानगी देते.
हेही वाचा- राज्यपालांना ठाकरे सरकारने विमानातून उतरवलं? भाजप आक्रमक
सरकारी विमान ही कुणाची वैयक्तिक मालमत्ता नाही!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 11, 2021
मा. राज्यपाल महोदयांना विमानातून खाली उतरवणं, इतका अहंकार महाविकास आघाडी सरकारमध्ये आला कुठून? pic.twitter.com/6lRovbYjRN
मी माहिती घेतल्यावर मला असं समजलं की, अशा प्रकारे पूर्ण कार्यक्रम जीएडीला देण्यात आला होता. यासंदर्भात मुख्य सचिवांना माहिती आहे. यासंदर्भातील फाईल मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली आहे. पण राज्यपाल विमानात बसेपर्यंत जाणीवपूर्वक परवानगी दिली नाही. त्यामुळे राज्यपालांना विमानातून उतरावं लागलं. हा पोरखेळ आहे! अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
एवढं अहंकारी सरकार मी आतापर्यंत बघितलेलं नाही. मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी अशा गोष्टीत अहंकार करणं अतिशय चुकीचं आहे. ही खासगी मालमत्ता नसून राज्याची मालमत्ता आहे. ही कुठल्याही व्यक्तीची मालमत्ता नाही. मला वाटत नाही की यामुळे राज्यपालांचं काही वाईट होईल, पण राज्याची प्रतिमा मात्र नक्कीच मलिन होईल. जनताच या सगळ्यात निकाल देईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उत्तराखंडमध्ये झालेल्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी उत्तराखंडमध्ये निघाले होते. या प्रवासासाठी ते सरकारी विमानाचा वापर करणार होते. परंतु त्यांच्या प्रवासाला परवानगी मिळाली नसल्याचं सांगण्यात आल्याने राज्यपालांना पुन्हा परतावं लागलं. त्यामुळे राज्यपाल आणि त्यांच्यासोबत असलेले अधिकारी खासगी विमानानं उत्तराखंडला जाण्यासाठी निघाले.