कायद्याच्या कसोटीवर टिकेलं असं कालबद्ध आरक्षण मराठा समाजाला देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी केलं. मराठा आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठक संपल्यानंतर पत्रकारांना माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजातील आंदोलकांना हिंसा आणि आत्महत्या न करण्याचं आवाहन देखील केलं.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. त्यानुसार सरकारने कार्यवाही देखील सुरू केली आहे. मराठा समाजाला शक्य तितक्या लवकर आरक्षण मिळावं, यासाठी सरकार प्रयत्न करत असलं, तरी हे आरक्षण कायद्याच्या पातळीवर टिकलं पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे.
मराठा समाजातील मान्यवरांसोबत आयोजित केलेल्या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार काय करत आहे, याची माहिती देण्यात आली. त्यावर मान्यवरांनी ज्या सूचना केल्या त्या सूचनांचा सरकार गांभीर्याने विचार करत आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसदर्भात तयार केलेल्या निवेदनार सर्वांनी सह्या केल्याचंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
सह्याद्री अतिथीगृहातील बैठकीला ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, पांडुरंग बलकवडे, कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई, अभिनेते सयाजी शिंदे, अमोल कोल्हे, उद्योजक भैरवनाथ भगवानराव ठोमरे आणि सुवर्ण कोकण संस्थेचे डॉ. सतीश परब आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा-
मराठा क्रांती मोर्चाचा राज्यभर जेलभरो
मराठा मोर्चाचा 'क्रांतीदिनी' पुन्हा एल्गार!