महाराष्ट्रात २३ जून २०१८ पासून प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली. आपल्याजवळचं प्लास्टिक संकलन केंद्रामधे आणून जमा करण्याचं आवाहनही करण्यात आलं अाहे. मात्र, अजूनही अनेक घरात, दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक शिल्लक आहे.
हे सर्व प्लास्टिक देऊन त्या बदल्यात रोपटे वाटप करण्याचा अभिनव उपक्रम 'अंघोळीची गोळी' या संस्थेमार्फत येत्या शनिवारी ७ जूलै रोजी आयोजित करण्यात आला आहे.
याबाबत 'अंघोळीची गोळी' या संस्थेचे सदस्य तुषार वारंग म्हणाले, नुकतीच प्लास्टिक वापरावर कायद्याने बंदी आणली. निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे. यानिमित्ताने आम्ही 'प्लास्टिक पिशव्या द्या; बदल्यात रोपटे घ्या' हा उपक्रम राबवत आहोत. यामध्ये आम्ही १०० रोपांचे वाटप करीत आहोत. ५ प्लास्टिक पिशव्यांच्या बदल्यात १ रोपटं देऊन जागृती करण्याचा आमचा मानस आहे.
शनिवारी दिनांक ७ जूलै रोजी माटुंगा (पु) येथील रामनारायण रुईया महाविद्यालयात हा उपक्रम सकाळी १० ते १ या वेळेत होणार अाहे. आपल्याजवळ असणाऱ्या प्लास्टिक पिशव्या देऊन त्या बदल्यात तुम्ही एक छानसं रोपटं घेऊन जाऊ शकता. रुईया महाविद्यालयातील एनएसएसच्या युनिटने या कामासाठी विशेष पुढाकार घेतला आहे.
हेही वाचा -
पोलिस आयुक्तालयात झाड कोसळलं, दोन गाड्यांचं नुकसान
६ सप्टेंबरपर्यंत टोलचा निर्णय घ्या- उच्च न्यायालय