चीनचं तियांगोंग-१ नावाचं भरकटलेलं स्पेस स्टेशन सोमवारी पहाटेपर्यंत केव्हाही पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हे स्पेस स्टेशन पृथ्वीच्या नेमक्या कुठल्या भागात कोसळेल, यावर जगभरात खल सुरू असताना मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागांत या स्पेस स्टेशनचे अवशेष कोसळतील, अशी चर्चा सुरू आहे. या चर्चेला अद्याप खगोलतज्ज्ञांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नसला, तरी मुंबईत काहीसं भीतीचं वातावरण पसरलं आहे.
चायना नॅशनल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन(सीएनएसए) ने हे चिनचं पहिलं स्पेस स्टेशन २०११ मध्ये अंतराळात सोडलं होतं, स्वर्गातील राजमहल असं त्याचं नामकरण करण्यात आलं होतं. या स्पेस स्टेशनचा २०१६ पासून संपर्क तुटल्याचं 'सीएनएसए'ने सांगितलं होतं.
हे स्पेस स्टेशन एखाद्या एका स्कूल बसच्या आकाराचं असल्याचं म्हटलं जात आहे. पृथ्वीच्या कक्षेत आल्यानंतर त्यात मुंबईसह राज्यातील काही भाग असल्याची शक्यता काही तज्ज्ञांनी वर्तवली आहे. सोमवारी पहाटे ४ वाजून ५५ मिनिटांनी हे स्पेस स्टेशन पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करेल, असा खगोलतज्ज्ञांचा अंदाज आहे. एकट्या महाराष्ट्रातच नव्हे, तर आंध्र प्रदेश, बंगालचा उपसागर या परिसरातही या स्पेस स्टेशनचे काही अवशेष पडतील, असं म्हटलं जात आहे.
पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यावर या घर्षणाने या स्पेस स्टेशनचे लहान लहान तुकडे होतील. हे तुकडे ठिकठिकाणी कोसळतील. या तुकड्यांमध्ये विषारी वायू असण्याची शक्यता असल्यामुळे या तुकड्यांना कुणीही हात लावू नये, असं आवाहन करण्यात येत आहे. भारतात पडणारे या स्पेस स्टेशनचे तुकडे २०० ते ३०० किमी परिसरात पडण्याची शक्यता आहे.