Advertisement

बेस्टला वाचवण्यासाठी टीसीच वाटतायत पत्रकं!


SHARES

रेल्वे स्टेशन, बसस्टॉप किंवा इतर गर्दीच्या जाहिरातीसाठी पत्रकं वाटताना अनेकांना तुम्ही पाहिलं असेल. कोचिंग क्लास, नोकरी, फूड प्रॉडक्ट अशा एक ना अनेक गोष्टींची जाहिरात करण्यासाठी अशी पत्रकं वाटली जातात. पण आता या यादीमध्ये बेस्टचा सुद्धा समावेश झाला आहे! कारण बेस्टने आपलं नवं प्रॉडक्ट अर्थात नवीन बसची जाहिरात करण्यासाठी पत्रकं वाटायला सुरुवात केली आहे. आणि ही पत्रकं वाटणारे कोण, हे कळल्यावर आश्चर्यचकित होऊ नका. कारण ही पत्रकं वाटणारे आहेत स्वत: बेस्टचे तिकिट चेकर!


बेस्टवर आर्थिक अरिष्ट!

पूर्वी प्रवासासाठी मुंबईकर बसला प्राधान्य देत असत. पण आता रिक्षा आणि टॅक्सी सोपा आणि आवश्यकतेनुसार पर्याय उपलब्ध झाल्याने मुंबईकरांनी बेस्टकडे पाठ फिरवली. त्यामुळे दिवसेंदिवस बेस्टची प्रवासी संख्या घटली. आर्थिक अडचणींमुळे बेस्टला कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेवर देणे जड जात आहे.


गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांची मागणी होती. त्यामुळे हा मार्ग चालू करून प्रवाशांना सेवा पुरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. बेस्टच्या उपक्रमाला देखील याचा फायदा होत आहे. प्रवाशांची देखील सोय होत आहे  

विष्णू शंकर इंगळे, सहाय्यक वाहतूक अधिकारी, प्रतिक्षानगर

आर्थिक संकटामुळे पुन्हा नफ्यात येण्यासाठी बेस्टने नवनवीन उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दक्षिण मध्य मुबईतील संगम नगर येथून वडाळा स्टेशनपर्यंत जाणारी 110 क्रमांकाची बससेवा सुरू करण्यात आली आहे. यापूर्वीही ही बस सुरु होतीच, मात्र ती वडाळा स्टेशनपर्यंत जात नव्हती. त्यामुळे 'बेस्टपेक्षा टॅक्सीच बरी' असा विचार प्रवासी करत होते.



संगमनगरपासून वडाळा स्टेशनपर्यंत जाण्याची मागणी प्रवासी बऱ्याच दिवसापासून करत होते. प्रवाशांचा हा मुद्दा अधिकाऱ्यांकडे मांडला. त्याचे सातत्याने पाठपुरावा करून ही बस सुरू केली. याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे उपक्रमाचे उत्पन्न वाढले आहे. प्रवाशांचा टॅक्सीचालकांवर राग होता.

लालासाहेब एकनाथ ठोंबरे, निरीक्षक, प्रतिक्षा नगर आगार 95



या परिसरातून वडाळा स्टेशनला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. तसेच वडाळा स्टेशनपर्यंत जाण्यासाठी नवीन बस सुरू करावी अशी मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून प्रवासी करत होते. या पार्श्वभूमीवर बेस्टने ही बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याची जाहिरात करण्यासाठी पारंपरिक मार्ग न वापरता बेस्टने थेट प्रस्थापित मार्केटिंग फंडा वापरला आणि आपल्या तिकीट चेकरच्याच हातात वाटण्यासाठीची पत्रकं सोपवली!


आम्हाला शेअरिंग टॅक्सी हवीच आहे. ही बस फक्त 9 वाजेपर्यंत सुरू राहते. टॅक्सीही बंद झाली तर मग रात्रीच्या वेळी घरी यायचे कसे? त्यामुळे रात्री येताना आम्हाला टॅक्सीचाच आधार आहे.

कांताप्रसाद, प्रवासी


बसचा मार्ग

संगमनगरपासून इंडियन पाईपलाईन, बरकतअली, वडाळा उड्डाणपूल, वडाळा चर्च आणि वडाळा स्थानकापर्यंत ही बस धावेल. सध्या ही बससेवा सकाळी 6.30 ते रात्री 8.45 पर्यंत अशी सुरू करण्यात आली आहे.


टॅक्सीवाल्यांचा विरोध

दरम्यान, बेस्टच्या नव्या बसमुळे आणि तिकिट चेकर्सच्या 'जाहिरातबाजी'मुळे टॅक्सीवाल्यांचं मात्र नुकसान होऊ लागलं आहे. शिवाय बस उभी रहात असल्यामुळे टॅक्सी उभी करायची हक्काची जागाही गेल्यामुळे टॅक्सीवाल्यांमध्ये मोठी नाराजी आहे. या प्रकारामुळे मोठं नुकसान सहन करावं लागत असल्याची प्रतिक्रिया काही टॅक्सीचालकांनी दिली आहे.


येथे लहानपणापासून राहात आहे. आता टॅक्सी चालवत आहे. इतक्या वर्षांपासून आता ही नवीन बससेवा का सुरू केली. यामुळे इथल्या 200 टॅक्सीचालकांनी जायचे कुठे?

नितेश वनकर, टॅक्सीचालक

शक्य ते सर्व प्रयत्न करुन झाल्यानंतर आता बेस्ट प्रशासनानं जाहिरातबाजीसाठी थेट आपल्या तिकिट चेकर्सलाच मैदानात उतरवलं आहे. आतातरी तोट्यातली बेस्ट फायद्यात येईल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.




हेही वाचा - 

मराठी कलाकार 'बेस्ट'ला वाचवण्यासाठी पुढे सरसावले

बेस्टला मिळणार 4 कोटी, कामगारांच्या पगाराचा प्रश्न सुटणार?


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा