कोरोनामुळे मागील ६ महिने देश ठप्प झाला आहे. देशभरात अनेक महिने लॉकडाऊन आहे. आता टप्प्याटप्प्याने अनलाॅक केले जात आहे. लॉकडाऊनमुळे सार्वजनिक ठिकाणी फिरण्यावर निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे सर्वांनाच संपूर्ण दिवस घरीच रहावे लागत होते. या कालावधीत लोकांच्या शारीरिक हालचाली मंदावल्या आहेत. अनेक नोकरदार मंडळी ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. याचा विपरीत परिणाम आरोग्यावर झाला आहे.
लॉकडाऊनमुळे घरीच बसून काम करावे लागत असल्याने दिवसभर एकाच जागी बसू राहिल्याने आरोग्याच्या समस्या उद्भभवल्या आहेत. आता अनलाॅक झाल्याने लोकांनी आरोग्याकडं लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. मात्र, जीम, हेल्थ क्लब बंद आहेत. त्यामुळे व्यायामाचा एक चांगला प्रकार लोकांनी निवडला आहे. तो म्हणजे सायकल चालवणे.
सद्या दुचाकी, चारचाकी वापरण्याचं प्रमाण मोठं आहे. त्यामुळे सायकल वापरण्याचं प्रमाण कमी आहे. मात्र, लाॅकडाऊनमध्ये सायकल उद्योगाला चांगले दिवस आले आहेत. अनलॉक सुरु झाल्यापासून दोन महिन्यांत देशभरात सायकलीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मेपासून जुलैपर्यंत जवळपास ३४ लाख सायकली विकल्या गेल्या आहेत. म्हणजे रोज ३७ हजार सायकलींची विक्री झाली.
भारतात दरवर्षी २.२० कोटी सायकलींचं उत्पादन होतं. भारत जगातील दुसरा सर्वात मोठा सायकल उत्पादक देश आहे. संपूर्ण देशात सायकल उद्योगाशी संबंधित जवळपास ४ हजार युनिट्स आहेत. यामध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त व्यावसायिक व युनिट्स लुधियानात आहेत. देशाच्या मागणीच्या जवळपास ९० टक्के उत्पादन करणार्या लुधियानाने या व्यवसायात १०० टक्के पेक्षा जास्त वाढ नोंदविली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत ही वाढ दुप्पट आहे. येथील ब्रॅण्डिंग सायकल कंपनींना नवीन सायकलची मोठ्या प्रमाणात ऑर्डर प्राप्त होत आहेत.
ऑल इंडिया सायकल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे सरचिटणीस केबी ठाकूर यांनी सांगितलं की, ५८ वर्षांत मी सायकलच्या मागणीत एवढी तेजी पाहिली नाही. कोरोना काळात सरकारी ऑर्डर बंद असतानाही सायकलच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे. देशात सायकलींचे उत्पादन एप्रिलमध्ये साडे चार लाखांवर आणि त्यानंतर जूनमध्ये साडे आठ लाखांवर गेले आहे. जुलै अखेर हा आकडा ११ लाखांच्या पुढे गेला आहे.
भारतीय सायकल उद्योग सध्या ५-६ टक्क्यांनी वाढत आहे. मात्र, मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने उद्योगांत २० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. दरवर्षी १४ कोटी सायकलींचे उत्पादन जगभरात होते. यामधील एकट्या चीनमध्ये ९ कोटी सायकलींचं उत्पादन होतं. तर २.२ कोटी सायकली दरवर्षी भारतात तयार होतात.