पंजाब आणि महाराष्ट्र को-आॅपरेटीव्ह (PMC) बँकेतील घोटाळ्यामुळे अडचणीत आलेले बँक ग्राहक या संकटातून बाहेर पडण्यासाठी वेगवेगळे पर्याय आजमावून बघत आहेत. कधी आंदोलन, तर कधी घेराव घालून आपला संताप व्यक्त करणाऱ्या बँकेच्या मोठ्या ठेवीदारांनी रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया (RBI) पुढं अनोखा प्रस्ताव ठेवला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास बँकेच्या खातेधारकांना मोठा दिलासा मिळू शकतो.
काही दिवसांपूर्वीच पीएमसी बँकेच्या खातेधारकांनी किल्ला कोर्टापुढं आंदोलन करून बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी एचडीआयएल (HDIL) कंपनीचे प्रवर्तक वाधवा बंधूना जामीन मिळू नये, अशी मागणी केली. तर त्यापाठोपाठ मुंबईच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना घेराव घालून आपल्या अडचणी त्यांच्यापुढं ठेवल्या होत्या.
यानंतर बँकेच्या मोठ्या ठेवीदारांची दादरच्या गुरूद्वारात नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत आरबीआयने पीएमसी बँकेवरील निर्बंध उठवल्यास ५ कोटी रुपयांहून जास्त रकमेच्या ठेवी असलेले साधारणत: २०० ठेवीदार पुढील ३ वर्षे बँकेतून पैसे काढून घेणार नाहीत, असा प्रस्ताव ठेवण्याचं ठरवलं आहे.
ही आमची बँक आहे. त्यामुळे ठेवीदारांच्या भल्यासाठी आम्ही तडजोड करण्यास तयार आहोत. त्यातूनच सर्व ठेवीदारांचं भलं होऊ शकतं. अन्यथा आरबीआयने बँकेचं विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतल्यास ते कुणाच्याही भल्याचं ठरणार नाही, असं श्री गुरू सिंग सभेचे रघबीरसिंग गिल म्हणाले
ही बैठक शहरातील १७ गुरूद्वारांचं नियंत्रण करणाऱ्या दादरच्या श्री गुरू सिंग सभा यांच्यामार्फत आयोजित करण्यात आली होती. प्रत्येक गुरूद्वाराची बँकेत १० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या ठेवी आहेत. या बैठकीला ३० हून अधिक मोठे ठेवीदार उपस्थित होते. हा प्रस्ताव आठवड्याभरात आरबीआयने नियुक्त केलेल्या प्रशासकांसमोर ठेवण्यात येईल.
आरबीआयने खातेधारक, ठेवीदारांना ६ महिन्यांत केवळ २५ हजार रुपये काढण्याची परवानगी दिल्याने बँकेच्या ग्राहकांपुढं मोठं संकट उभं राहीलं आहे. ही मर्यादा वाढवून वर्षाला १ लाख रुपये करण्यात यावी तसंच एटीएम, डेबिट कार्ड देखील सुरू करण्यात यावं, अशी मागणीही या प्रस्तावात करण्यात येणार आहे.
हेही वाचा-
संतप्त PMC बँक खातेधारकांचा अर्थमंत्र्यांना घेराव, सीतारमण यांनी दिलं 'हे' आश्वासन
PMC घोटाळा: वाधवा बंधूंना १४ आॅक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी