रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया (RBI)ने मुंबईतील पंजाब आणि महाराष्ट्र को- आॅप बँके (PMC)वर आर्थिक निर्बंध लादल्याने बँकेचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. यामुळे पीएमसी बँकेच्या ग्राहकांना कुठल्याही खात्यांतून केवळ १ हजार रुपयेच काढण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे धास्तावलेल्या बँक ग्राहकांनी मंगळवार सकाळपासूनच बँकेच्या सर्व शाखांमध्ये गर्दी केली आहे. या बँक ग्राहकांना दिलासा देत सर्व पैसे सुरक्षीत असल्याचं आश्वासन पीएमसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जाॅय थाॅमस यांनी दिलं आहे.
“तुम्हा सर्वांसाठी ही कठीण वेळ आहे आणि माफी मागून तुमच्या अडचणी कमी होणार नाहीत याची मला कल्पना आहे. पण, कृपया तुम्ही आम्हाला सहकार्य करा, या कठीण परिस्थितीवर नक्कीच मात करु आणि खंबीरपणे पुन्हा उभे राहू असा आम्हाला विश्वास आहे”असंही थाॅमस म्हणाले.
‘आरबीआय’ने पीएमसी बँकेवर ६ महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. यानुसार, पीएमसी बँकेला नवीन कर्ज देणे, ठेवी स्वीकारता येणार नाहीत. तसंच निर्बंधाच्या काळात बँकेच्या ठेवीदारांना आपल्या सर्व प्रकारच्या खात्यांमधून केवळ १ हजार रुपयेच काढता येतील.
आरबीआयने पीएमसी बँकेवर निर्बंध लादल्याचं समजल्यापासून मंगळवार सकाळपासूनच बँकेच्या ठेवीदारांमध्ये गोंधळाचं वातावरण पसरलं आहे. आपल्या पैशांचं काय होणार? या चिंतेने सतावलेल्या ग्राहकांनी पीएमसी बँकांच्या शाखांसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. त्यामुळे तणावाची परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनांही बोलवावं लागलं आहे.
हेही वाचा-
Video: PMC बँकेत धास्तावलेल्या ग्राहकांची मोठी गर्दी
धक्कादायक! PMC बँकेवर आर्थिक निर्बंध, खातेधारकांना एवढीच रक्कम काढता येणार