मुंबईतील कुलाबा ते शीवदरम्यानच्या रस्त्यावरील १ हजार ४२५ मॅनहोल्सला संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्याची माहिती गुरूवारी मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात दिली. सोबत पावसाळ्यासाठीही महापालिका सज्ज असल्याचाही दावा महापालिकेनं एका प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे.
गेल्या वर्षी पावसाळ्यात एल्फिन्स्टन रोड येथील मॅनहोल्समध्ये पडून डाॅ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला होता. यानंतर महापालिकेच्या उघड्या मॅनहोल्सचा प्रश्न एेरणीवर आला. तर दुसरीकडे रिटेल ट्रेडर्स वेल्फेअरने डाॅ. अमरापूरकर यांच्या मृत्यूसाठी महापालिकेला जबाबदार धरत महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली.
या याचिकेवर गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीत न्यायालयानं महापालिकेला आतापर्यंत किती मॅनहोल्सना जाळ्या बसवल्या यासंबंधीची विचारणा केली होती. जाळ्यास बसवण्यास विलंब होत असल्याबाबत नाराजी व्यक्त करत २१ जूनपर्यंत किती मॅनहोल्सना जाळ्या बसवल्या यासंबंधीचं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही महापालिकेला दिले होते.
त्यानुसार गुरूवारी महापालिकेनं न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं असून या प्रतिज्ञापत्रात १ हजार ४२५ ठिकाणी संरक्षक जाळ्या बसवण्याचा दावा केला आहे. तर मुंबईत पाणी तुंबू नये यासाठी वाॅटर पंप आणि ६ पम्पिंग स्टेशन्स सज्ज आहेत. मुंबईच्या सर्व किनाऱ्यावर ३६ जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. तसंच बाकीही सर्व उपाययोजना करण्यात आल्याचंही महापालिकेनं या प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे. दरम्यान या याचिकेवरील पुढील सुनावणी आता १८ जुलैला होणार आहे.
हेही वाचा-
पावसात मॅनहोल्सचे झाकण उघडल्यास जेलची वारी
नालेसफाई होऊनही दक्षिण मुंबई तुंबणार!