मुंबईतील रेल्वे मार्गावर तब्बल ३५ उड्डाणपूल असून त्यातील केवळ ६ रेल्वे पूल चांगल्या स्थितीत असल्याची माहिती समोर आली आहे. उर्वरीत पुलांपैकी १७ रेल्वे पुलांची किरकोळ दुरुस्ती, तर १२ रेल्वे पुलांची मोठी दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या सर्व पुलांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरु केल्याची माहिती महापालिका प्रशासनानं दिली आहे.
मुंबई महापालिकेने रेल्वेला आतापर्यंत ११४ कोटी रुपये देऊनही रेल्वेने कोणत्याही प्रकारे पुलांची डागडुजी केली जात नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी रेल्वे मार्गासह मुंबईतील १८ पूल धोकादायक असल्याचा गौप्यस्फोट केला होता. यावर अभिप्राय देताना महापालिका पूल विभागाचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेला मागील १८ वर्षात १३३ कोटी रुपये दिल्याचं म्हटलं आहे. पुलांची दुरुस्ती, पुनर्बांधणी तसेच पुलांची बांधणी याकरीता मध्ये रेल्वेला ११४ कोटी रुपये आणि पश्चिम रेल्वेला १९ कोटी रुपये दिल्याचं म्हटलं आहे.
मुंबईत रेल्वे मार्गावर एकूण ३५ रेल्वे पूल असून त्यापैकी ६ रेल्वे पूल हे चांगल्या स्थितीत आहेत. १७ रेल्वे पुलांची किरकोळ दुरुस्ती करण्याची गरज असून १२ रेल्वे उड्डाणपुलांची मोठ्या दुरुस्तीची गरज आहे. त्यामुळे या किरकोळ दुरुस्ती व मोठ्या स्वरुपाच्या दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरु असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. दादरचं टिळक पूल, एलफिन्स्टन पूल, करीरोड पूल आदी १२ उडाणपुलांच्या मोठ्या स्वरुपाची दुरुस्तीची गरज असल्याचे समजते.
रेल्वे हद्दीत एकूण ३६ पादचारी पूल असून त्यापैकी केवळ ४ पादचारी पूलच चांगल्या स्थिती असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. उर्वरीत २६ पादचारी पुलांची किरकोळ दुरुस्ती आणि ४ पादचारी पुलांची मोठ्या प्रमाणात दुरुस्तीची आवश्यकता असल्याचं महापालिकेने म्हटलं आहे. तर २ पादचारी पूल अतिधोकादायक असून त्यापैकी एक पूल रेल्वेच्यावतीनं पाडण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा-
हँकॉक पुलाचा बांधकाम खर्च पावणे दोन कोटींनी वाढला
आयआयटी तपासणार कर्नाक पुलाचे आराखडे