'बिनपगारी फूल अधिकारी' हे सर्वपरिचीत वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. पण १० वर्षे गैरहजेरी, तरीही फूल पगारी! हे वाक्य नक्कीच ऐकलं नसेल. पण हे खरं आहे. मरोळच्या राखीव पोलिस दलातील एक पोलिस कर्मचारी १० वर्षे गैरहजर राहूनही पूर्ण पगार घेत आहे, तर त्याच पोलिस दलातील दुसऱ्या कर्मचाऱ्याने वाढीव सुट्टी घेतली म्हणून त्याचा पगारच थांबवण्यात आला आहे. हा दुपट्टीपणा नाही तर काय?
कायदा सर्वांसाठी समान असतो, त्यानुसार प्रत्येकाला समान वागणूक मिळायला हवी, अशी सर्वांचीच अपेक्षा असते. असं असताना वरिष्ठांकडून मुंबई पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याला वेगळी आणि दुसऱ्या कर्मचाऱ्याला वेगळी वागणूक दिली जात असल्याची धक्कादायकबाब उघडकीस आली आहे. या दुटप्पी धोरणामागे वरिष्ठांकडून झालेली एक मोठी चूक कारणीभूत असल्याची माहिती सूत्रांकडून 'मुंबई लाइव्ह'ला मिळाली आहे.
मरोळच्या राखीव पोलिस दलात कार्यरत असलेले ज्ञानेश्वर अहिरराव यांच्याबाबत हा सगळा प्रकार घडला आहे. ज्ञानेश्वर अहिरराव हे मातोश्री बंगल्यावर ड्युटीसाठी आहेत. मार्च महिन्याच्या २० ते २२ तारखेदरम्यान म्हणजेच ३ दिवस रजा घेऊन ते एका कार्यक्रमासाठी गावी गेले होते.
मात्र, यादरम्यान त्यांच्या पत्नीच्या पायाला दुखापत झाली. 'पत्नीच्या पायावर औषधोपचार करण्यासाठी इथे थांबणं आवश्यक असल्यामुळे मी काही दिवस कामावर येऊ शकणार नाही', असं त्यांनी ठाणे अंमलदार यांना फोन करून कळवलं.
२८ मार्चला घरची परिस्थिती स्थिरस्थावर झाल्यानंतर ज्ञानेश्वर अहिरराव पुन्हा कामावर रुजू झाले, तेव्हा रजा वाढवल्याचं कारण देत त्यांचा पगार थांबवण्यात आला. विशेष म्हणजे आहिरराव यांच्या सुट्ट्या बाकी असताना देखील त्यांच्यावर ही कारवाईला करण्यात आली.
निव्वळ सुट्टीमध्ये वाढ झाल्याने त्यांचा पगार थांबवण्याचा निर्णय विभागाकडून घेण्यात आला. त्यामुळे उद्भवलेल्या आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गणवेशामध्ये भीक मागण्याची परवानगी मागणारं पत्र पोलिस आयुक्त, मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पाठवलं. हे प्रकरण प्रसारमाध्यमांनी उचलन धरल्याने आहिरराव यांना १० मे रोजी पोलिस दलातून निलंबित करण्यात आलं.
ऐकीकडे ३ दिवस वाढीव सुट्टी घेतली म्हणून आहिरराव यांचा पगार पोलिस प्रशासनाकडून थांबवण्यात आला. मात्र दुसरीकडे मागील १० वर्षांपासून गैरहजर राहिलेल्या पोलिस शिपायाल नियमीत पगार देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मुंबई पोलिस दलातील बक्कल क्रमांक १९५६५ पोलिस हवालदार अशोक बाळू कानडे हे मागील १० वर्षांपासून गैरहजर आहेत. २००६ मध्ये प्रोटेक्शन सिक्युरिटी विभागात कामाला असलेले अशोक कानडे वरिष्ठांची पूर्व परवानगी न घेताच गैरहजर राहू लागले. असं असलं, तरी त्यांच्या खात्यावर पोलिस प्रशासनाने पूर्ण पगार जमा केला. ज्या वेळी कानडे स्वतः हून २०१५ मध्ये पुन्हा प्रोटेक्शन सिक्यूरिटी विभागात हजर झाले. त्यावेळी वरिष्ठांच्या लक्षात ही बाब आली.
त्यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कानडे यांना तातडीने जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून दादर पोलिस ठाण्यात हजर होण्यास सांगितलं. मात्र त्यानंतरही कानडे सतत गैरहजर राहिले. पोलिसांकडून झालेली ही चूक वरिष्ठांच्या लक्षात येताच, त्यांनी कानडेवर विभागीय चौकशीचे आदेश दिले.
वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे झालेली ही घोडचूक लपवण्यासाठी आता वरिष्ठ पोलिस अधिकारी खटपट करत असल्याचं कळत आहे. कानडेवर विभागीय चौकशी लावून त्यांना त्यात दोषी ठरवत, वरिष्ठांनी केलेल्या चुकीवर पडदा टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
कारण असं की, कानडे ३० मे रोजी निवृत्त होत आहेत. निवृत्तीनंतर त्यांचा भविष्य निधी रोखण्यासाठी ही खटपट सुरू आहे. विभागीय चौकशीत कानडे यांना दोषी ठरवत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करून आपली चूक लपवण्याचा अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे कानडे प्रकरणात दोषींवर निलंबनाची कारवाई होते की अहिरराव यांना न्याय मिळतो? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा-
हे काय भलतंच? पोलिस शिपायाला मागायचीये गणवेशात भीक!
ड्रोन टिपणार मुंबईकरांच्या हालचाली
पाकिस्तानात प्रशिक्षण घेऊन आलेल्या एकाला अटक