मुंबई शहर, उपनगरातील रस्त्यावर गोविंदा पथकांचा जल्लोष दिसून येत आहे. लहान-मोठी दहीहंडी फोडण्यात प्रत्येक गोविंदा पथक मश्गुल आहे. उत्साहाच्या भरात थर कोसळून गोविंदांना दुखापत होण्याच्या घटनाही घडत आहेत. अशा विविध घटनांमध्ये आतापर्यंत १२१ गोविंदा जखमी झाले असून त्यांच्यावर ठिकठिकाणच्या खासगी आणि सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रात्री ८ वाजेपर्यंत जखमी १२१ गोविंदांपैकी २५ गोविंदांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करून घेण्यात आलं. तर ९५ गोविंदांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं. तसंच एका गोविंदाचा मृत्यू झाला. त्यातील सायन रुग्णालयात २, परळच्या केईएम रुग्णालयात ९ जणांवर उपचार सुरू आहेत. जी.टी. रुग्णालयात २, एस.एल. रहेजा रुग्णालय १, सेंट जाॅर्ज रुग्णालय ४, एम. टी. अग्रवाल रुग्णालय ३, राजावाडी रुग्णालय १, महात्मा फुले रुग्णालय १, कूपर रुग्णालय १ आणि ट्रामा केअर रुग्णालयात १ गोविंदांना दाखल करण्यात आलं आहे.
यापैकी कालेलकर गोविंदा पथकाचे गोविंदा रवीराज गंगाराम चांदोरकर (३५) यांच्यावर केईएम रुग्णालत उपचार करून त्यांना सोडून देण्यात आलं. तर जान्हवी जयवंत पतोडे (१४) हिला पायाला मार लागला असून तिच्यावर केईएममध्ये उपचार करून तिला देखील सोडून देण्यात आलं. श्री गणेश गोविंदा पथकातील मनाली सुधीर मेने (१८), शंकर बाबुराव कागलाराम, अमेय हिराचंद पाटील (२५) हा वडाळ्यातील यश गोविंदा पथकातील गोविंदा आणि यज्ञ बाळकृष्ण मोरे यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
खार दांडा इथं रविवारी सरावादरम्यान १४ वर्षीय चिराग पटेकर हा गोविंदा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खार येथील होली फॅमिली रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सोमवारी सकाळीच आमदार अॅड. आशिष शेलार यांनी त्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्याला १ लाखाची मदत केली.
हेही वाचा-
ठिकठिकाणी दहीहंडीचा थरथराट सुरू
यंदा रंगणार प्रो दहिहंडीचा थरार