गणेशोत्सव अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपला असून, सर्व गणेशोत्सव मंडळ गणपती बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी करत आहेत. मात्र, यंदा मुंबईसह उपनगरातील गणेशोत्सव मंडळांची बाप्पाच्या आगमनावेळी मोठी गैर सोय होण्याची शक्यची आहे. कारण, मुंबईसह उपनगरातील वाहतुकीसाठी धोकादायक ठरलेले २९ पूल बंद केले आहेत. यामधील काही पूल हे हलक्या वाहतुकीसाठी सुरू असून जड वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत. मात्र, पूल जड वाहनांसाठी बंद केल्यामुळं गणपती न्यायचे कुठून? असा सवाल गणेशोत्सव मंडळांनी केला आहे. याबाबत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या दालनात होणाऱ्या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या दालनात होणाऱ्या बैठकीत खड्डे, विविध परवानग्या, ध्वनिप्रदूषण याबाबतही चर्चा होणार आहे. या बैठकीदरम्यान वाहतुकीसाठी बंद केलेल्या पुलांबाबत चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, यंदा १ सप्टेंबरपासून गणपती बसणार असून १५ ऑगस्टपासून सार्वजनिक मंडळांच्या गणरायाच्या आगमन सोहळे सुरू होणार आहेत. परंतु, मुंबईत बंद असलेले पूल आणि खड्ड्यांमुळे बाप्पाचे आगमन करणं भक्तांना कठीण झाला आहे.
करीरोड, चिंचपोकळी, घाटकोपर, जुहू तारा रोड उड्डाणपूल अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत. गणपती बाप्पांचे सर्वाधिक कारखाने हे लालबाग-परळ परिसरात असल्यानं आगमनावेळी गणेश मंडळांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
या उड्डाणपुलावरून प्रवास करण्यासाठी मंडळांना सूट दिली जावी यासाठी गणेशोत्सव समन्वय समिती प्रयत्न करत असून, खड्डे बुजविणे, वाहतूककोंडी होऊ नये यासाठी मेट्रोचे बॅरिकेड्स आत घेण्याची मागणी करत आहेत. त्याशिवाय, महापौर व पालिका आयुक्तांनी प्राधान्यानं याकडं लक्ष देण्याची मागणीही समितीतर्फे केली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं गणेशोत्सवात गणरायाच्या आगमनासाठी उड्डाणपूलं खूले ठेवणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा -
मी केवळ संघासाठी नव्हे देशासाठी खेळतो- रोहित शर्मा
विधानसभेसाठी शुक्रवारपासून शिवसेनेच्या 'माऊली संवाद' उपक्रमाला सुरूवात