Advertisement

तुम्हाला माहिती आहे, मुंबईतला पहिला वडापाव कोणता?

भारताचे माजी आंतरराष्ट्रीय पंच माधवराव गोठोस्कर यांच्या मुंबईबद्दलच्या आठवणींच्या पेटाऱ्यातून मुंबईतल्या पहिल्या बटाटेवड्याची आठवण निघाली आणि आम्ही अवाक् झालो! गोठोस्करांच्या या आठवणीने वैद्यांच्याही 20 वर्ष आधी मुंबईत बटाटेवडा होता आणि तोही फेमस होता याचा नव्यानेच शोध लागला!

तुम्हाला माहिती आहे, मुंबईतला पहिला वडापाव कोणता?
SHARES

1946 साली लेडी जमशेदजी रोडवर महाजन उपहारगृह प्रसिद्ध होतं. आणि महाजनांचा बटाटेवडा दादरमध्ये फेमस होता! बटाटेवड्यासोबत त्यांची मिसळ भारी प्रसिद्ध होती!

भारताचे माजी आंतरराष्ट्रीय पंच माधवराव गोठोस्कर यांच्या मुंबईबद्दलच्या आठवणींच्या पेटाऱ्यातून मुंबईतल्या पहिल्या बटाटेवड्याची आठवण निघाली आणि आम्ही अवाक् झालो! आत्तापर्यंत अशोक वैद्य आणि समळ यांचा वडापाव मुंबईत सर्वात पहिला अशीच सर्वमान्य माहिती होती. पण माधवराव गोठोस्करांच्या या आठवणीने वैद्यांच्याही 20 वर्ष आधी मुंबईत बटाटेवडा होता आणि तोही फेमस होता याचा नव्यानेच शोध लागला!

महाजन उपहारगृहाबद्दल आम्ही तर कधीच एेकले नाही. कदाचित वडिलांना माहीत असेल. आमचा तर तेव्हा जन्म देखील झाला नव्हता. त्यावेळी मिल कामगार मोठ्या प्रमाणात दादर स्टेशनला येत असत. म्हणून वैद्य आणि समळ कटुंबाने वडापाव विक्रीला सुरुवात केली.

नरेंद्र वैद्य-अभिजित समळ, वडापाव विक्रेते(1966 सालापासून)


म्हात्रे वडापाव


स्वातंत्र्यपूर्व काळातला बटाटेवडा!

वडापाव हे तसं तमाम मुंबईकरांचं आद्य खाद्य म्हटलं तरी कुणाला फारसं वावगं वाटणार नाही! जवळपास प्रत्येक गल्लीत एक या प्रमाणात मुंबईत वडापावचे स्टॉल, हॉटेलं, हातगाड्या किंवा अगदी गेला बाजार सायकलवरचे डबे आहेत. पण या सगळ्याची सुरुवात भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे अगदी 1946 साली झाली हे मात्र माधवराव गोठोस्करांच्या आठवणींमुळे समजलं.

माझं वय आहे ३६ आणि मला २२ वर्ष झाली वडापावचं दुकान चालवायला. वडिलांनंतर आमचा व्यवसाय मीच चालवतोय. त्यामुळे मला एवढं जुनं काही माहीत नाही. माझे वडील स्वत: मिल कामगार होते. त्यामधून त्यांनी वडापाव विक्रीचा उद्योग सुरु केला.

वैभव म्हात्रे, वडापाव विक्रेते(1967 सालापासून)


याच ठिकाणी होतं महाजनांचं उपहारगृह


..आणि मुंबईतला पहिला बटाटेवडा गायब झाला!

तर, लेडी जमशेदची रोडवर आजपासून जवळपास 70 वर्षांपूर्वी महाजनांच्या उपहारगृहातला बटाटेवडा आणि मिसळ फेमस होती. या भागात रहाणाऱ्या मुंबईकरांसाठी महाजनांचा वडापाव आणि मिसळ म्हणजे दिवसाची सुरुवात! काहींसाठी दुपारचं जेवण, तर बऱ्याच जणांसाठी रात्रीचं जेवण असायचं. पण कालांतरानं महाजनांचं उपहारगृहच बंद झालं. त्यामुळे मुंबईतला हा पहिला बटाटेवडा कोणत्याही चर्चा किंवा गॉसिपशिवाय गायब झाला. पण अजूनही या भागातले जुनेजाणते मुंबईकर या बटाटेवड्याच्या आठवणी मोठ्या 'चवीने' सांगतात. तेव्हा गायब झालेला बटाटेवडा पुढे थेट 1966मध्येच उगवला!

माझ्या आधी वैद्य आणि म्हात्रे हे होते. पण त्याआधीची मला काही कल्पना नाही. माझं लहानपण दादर विभागात गेलं. गेली ३४ वर्ष मी हा धंदा करत आहे.

मनोहर भोसले, मालक, समर्थ वडापाव (1983 सालापासून)


दादर येथील प्रसिद्ध समर्थ वडापाव


महाजनांच्या बटाटेवड्याचा पुनर्जन्म!

महाजनांच्या बटाटेवड्याचा पुनर्जन्म झाला तो 'मुंबईतला पहिला वडापाव' म्हणून नावलौकिक असलेल्या वैद्य आणि समळ यांच्या वडापावच्या रुपाने! 1966मध्ये शिवसेनेच्या स्थापना वर्षीच मुंबईतल्या पहिल्या(सर्वमान्य!) वडापावचीही तसं पाहिलं तर 'स्थापना' झाली! त्यानंतर मग दादर परिसरातले समर्थ वडापाव, कबुतरखाना परिसरातले म्हात्रे वडापाव यांच्या व्यवसायाला सुरुवात झाली. यांच्यापैकी कुणालाच महाजन बटाटेवड्याबद्दल फारशी कल्पना नसली, तरी आख्खं बालपण याच परिसरात घालवलेल्या माधवराव गोठोस्करांच्या जिभेवर मात्र महाजनांच्या बटाटेवड्याची चव अजूनही रेंगाळत आहे!



हेही वाचा

वडापाव पेपरमध्ये गुंडाळून विकण्यास बंदी? महापालिकेत आणणार ठराव


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा