मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांचा दादर इथल्या बालमोहन विद्यामंदिरातील (Balmohan Vidyamandir) आयोजित कार्यक्रमात गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील हे दोघंही बालमोहन शाळेचे विद्यार्थी आहेत. सध्याच्या सरकारमध्ये ते महत्त्वाच्या पदावर विराजमान आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वर्गमित्रांनी गौरव केला, तर जयंत पाटील यांनादेखील त्यांच्या वर्गमित्रांनी सन्मानित केलं.
उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांनी यावेळी आपल्या शाळेच्या दिवसांना उजाळा दिला. उद्धव ठाकरे म्हणाले की, बालमोहन शाळेतून आपल्याला बरंच काही शिकायला मिळालं. बालमोहन शाळा म्हणजे फक्त चार भिंती नाहीत, तर माझ्यासाठी ते संस्कार आहेत. मी आज जे काही आहे त्यात माझ्या शाळेचं खूप मोठं योगदान आहे. बालमोहन आणि जे जे स्कूल ऑफ आर्टनं मला खूप काही दिलं. आजची पिढी हुशार आहे. त्यांना कोणत्या मार्गानं जावं, हे माहित आहे.
राज्यातील जलसंपदा मंत्री जयंत पाटील शाळेतील जुन्या गोष्टी आठवताना म्हणाले की, शालेय सुट्टीच्या वेळी क्रिकेट खेळणं मला आवडायचं. जेव्हा जेव्हा शाळेला ब्रेक असायचा तेव्हा आम्ही थेट शिवाजी पार्कवर क्रिकेट खेळायला जायचो. शाळेतल्या दहीहंडिमध्ये देखील उत्साहानं भाग घ्यायचो. शाळेनं दिलेल्या शिक्षा आणि संस्कृतीमुळे आम्ही आज या ठिकाणी आहोत.
जयंत पाटील यांनी कार्यक्रमादरम्यान उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं. जयंत पाटील म्हणाले की, मला माहित होते की उद्धव ठाकरे हे बालमोहनचे विद्यार्थी आहेत आणि बालमोहनचे विद्यार्थी कधीही चूक करीत नाहीत.
उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील हे दोघेही राजकीय कुटुंबातून आले आहेत. उद्धव ठाकरे १९७६ आणि जयंत पाटील १९७७ बॅचचे विद्यार्थी आहेत. उद्धव ठाकरे यांचे वडील बाळ ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली तर जयंत पाटील यांचे वडील राजाराम बापू पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. एक मुख्यमंत्री तर, दुसरे कॅबिनेट मंत्री असणं ही कोणत्याही शाळेसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
सोमवारी दुपारी बालमोहन विद्यामंदिर शाळेत गौरव समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. बालमोहन विद्यामंदिर शाळेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी उद्धव ठाकरे यांचे वर्गमित्र आणि नाट्यनिर्देशक अजित भूरे यांनी संवाद साधला.
हेही वाचा
आम्हाला हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही- उद्धव ठाकरे