Advertisement

मोदी दंगलखोरांच्या पाठिशी, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी आरोप

भिडेंविरोधात पुरावा मिळाल्यावर आम्ही अटक करू, असं मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलं. आरोपीला अटक करण्यासाठी जे काही पुरावे लागतात ते सगळे पुरावे भिडेंविरोधात आहेत. तरीही त्यांना अटक होत नसून भिडेंना जावयासारखी वागणूक दिली जात आहे, असंही आंबेडकर म्हणाले.

मोदी दंगलखोरांच्या पाठिशी, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी आरोप
SHARES

कोरेगाव-भीमा दंगलीचा कट रचण्याच्या आरोपाखाली मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे या दोघांवर गुन्हा दाखल असताना या प्रकरणी केवळ एकबोटेंना अटक होते आणि दुसरा आरोपी मात्र मोकाट फिरतो ही मोठी विसंगती आहे. हा सारा प्रकार केवळ भिडेंना वाचवण्यासाठीच होत असून फक्त राज्य सरकारच नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या मागे हात असल्याचा सनसनाटी आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. दंगलखोराना वाचवण्याच्या प्रयत्नात पंतप्रधान या देशात कायदा आणि सुव्यवस्था नसल्याचं दाखवून देत असल्याची टीकाही आंबेडकर यांनी केली.


२६ मार्चला एल्गार मोर्चा

भिडे यांना अटक व्हावी या मागणीसाठी २६ मार्चला मुंबईत एल्गार मोर्चाची हाक देण्यात आली आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांनी गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत भिडेंना अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकर त्यांनी हा आरोप केला.


सरकारी जावयासाठी वागणूक

भिडेंविरोधात पुरावा मिळाल्यावर आम्ही अटक करू, असं मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलं. आरोपीला अटक करण्यासाठी जे काही पुरावे लागतात ते सगळे पुरावे भिडेंविरोधात आहेत. तरीही त्यांना अटक होत नसून भिडेंना जावयासारखी वागणूक दिली जात आहे, असंही आंबेडकर म्हणाले.


मोदींचं संरक्षण

मोदींच्या जवळ असणाऱ्यांनी दंगल केली, चोरी केली वा बँक लुटली तरी त्यांना काहीच होत नाही हाच संदेश यामुळे समाजात पसरत आहे, असं म्हणत आंबेडकरांनी मोदींवर निशाणा साधला.


मोर्चा होणारच

भिडेंच्या अटकेच्या मागणीसाठी काढण्यात येणारा मोर्चा होऊ नये यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न होत आहेत. पण भिडेंना अटक होत नसल्याने जनतेमधील रोष वाढत आहे. भिडेंची अटकच या रोषाला रोखू शकते, असं सांगत आंबेडकर यांनी २६ मार्चला मोठ्या संख्येने सर्वसामान्य जनता आझाद मैदानावर धडकेल, असा इशाराही दिला.


अॅट्रासिटीचा निर्णय दुर्देवी

सर्वोच्च न्यायालयाकडून नुकताच देण्यात आलेला अॅट्राॅसिटीबाबतचा निर्णय अत्यंत दुर्देवी असून या निर्णयाविरोधात लार्जर ब्रँचकडे दाद मागण्याची गरज असल्याचं मतही यावेळी आंबेडकर यांनी व्यक्त केलं. या निर्णयामुळे न्यायालयावरचा विश्वास कमी होणार असून आता मागासवर्गीयांना नव्या भीतीखाली जगावं लागणार आहे.

मुळात संसदेसारखी एक व्यवस्था असताना सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रासिटीच्या निर्णयाद्वारे नवी व्यवस्था निर्माण केली आहे. त्यामुळे संसदेचा नियम मानायचा की सर्वोच्च न्यायालयाचा अशी संभ्रमावस्था निर्माण झाल्याचंही आंबेडकर म्हणाले.



हेही वाचा-

एकबोटेंप्रमाणे भिडेंवर कारवाई का नाही?

भीमा-कोरेगाव हिंसाचार: मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडेंना अटक होणार-मुख्यमंत्र्यांचं आश्वासन



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा