Advertisement

बालहट्ट पुरवण्यासाठीच ‘नाईटलाइफ’चा निर्णय?, प्रविण दरेकरांचा सवाल

मुंबईतील कायदा- सुव्यवस्था ढासळत असताना केवळ पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा हट्ट पुरवण्यासाठीच ‘नाईटलाइफ’चा निर्णय घेण्यात आला आहे का? असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला.

बालहट्ट पुरवण्यासाठीच ‘नाईटलाइफ’चा निर्णय?, प्रविण दरेकरांचा सवाल
SHARES

येत्या २७ जानेवारीपासून मुंबईमध्ये ‘नाईटलाइफ’ (night life in mumbai) सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाने (state cabinet) या निर्णयाला बुधवारी मंजुरी दिली. परंतु मुंबईतील कायदा- सुव्यवस्था ढासळत असताना केवळ पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (tourism minister aaditya thackeray) यांचा हट्ट पुरवण्यासाठीच ‘नाईटलाइफ’चा निर्णय घेण्यात आला आहे का? असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin darekar) यांनी उपस्थित केला आहे. 

यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दरेकर म्हणाले, सोमवारी रात्री कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस जवळ एका महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. मुंबईत बलात्कार, दरोडे, खून यांसारख्या घटना घडत असताना आणि त्यामुळे सामान्य  मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत असताना ‘नाईटलाइफ’चा घाट कोणाचा बाल हट्ट पुरविण्यासाठी घेतला जात आहे. 

हेही वाचा- आता मुंबई रात्रभर जागणार, ‘नाईटलाइफ’ला मंत्रिमंडळाची मंजुरी

मुंबईत पोलिसांची (mumbai police) संख्या आधीच कमी आहे. त्यामुळे त्यांच्यावर नेहमीच कामाचा ताण-तणाव असतो. त्यातच ‘नाईटलाइफ’ सुरु झाल्यास पोलिसांवरील कामाचा ताण वाढून त्याचा परिणाम मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेवर होईल, अशी चिंताही दरेकर यांनी व्यक्त केली. 

मुंबईतील मरिन ड्राईव्ह, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, लोअर परळ आदी उच्चभ्रू वस्तीतील अनिवासी भागात ‘नाईटलाइफ’ ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. या संकल्पनेनुसार माॅल, हाॅटेल-रेस्टाॅरंट २४x७  सुरू ठेवता येणार आहे. हा निर्णय ऐच्छीक असेल. 

याआधी ‘मन दूषित असेल, तर दृष्टीकोनही तसाच असतो,’ असं म्हणत आदित्य ( aaditya thackeray) यांनी भाजपकडून (bjp) होणाऱ्या विरोधाला प्रत्युत्तर दिलं होतं. सद्यस्थितीत मुंबई पोलीस रात्री दीड वाजेपर्यंत दुकाने खुली आहेत की बंद याचा आढावा घेत फिरत असतात. त्यांची या जबाबदारीतून मुक्तता होईल. शिवाय माॅल आणि दुकान चालकांना पोलिसांकडून ठराविक रक्कम अदा करून खासगी सुरक्षाही घेता येईल. यामुळे पोलीस विभागाच्या महसूलात भर पडेल. 

हेही वाचा- मी स्वत: अनुभवलीय मुंबईतली नाईटलाइफ, प्रकाश आंबेडकरांनी दिलं समर्थन

त्याचबरोबर बार आणि पब (pub and bar) जुन्या नियमानुसार रात्री दीड वाजेपर्यंतच सुरू राहतील. या नियमात कुठलाही बदल केला जाणार नाही. ज्यांनी यासंदर्भातील जीआर वाचलेला नाही, त्यांनी आधी जाऊन जीआर (GR) वाचावा. कारण पब आणि बारसाठी महसूल खात्याचे जे नियम आहेत, ते बदलण्यात आलेले नाहीत, असंही आदित्य म्हणाले.


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा