गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांवरील आरोपांची चौकशी लोकायुक्तांमार्फत करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
प्रकाश मेहता आणि सुभाष देसाईंच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेल्या विरोधी पक्षांनी सभागृहात गोंधळ घालायला सुरुवात केली. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा तत्त्वांना तडजोड करण्याची वेळ येईल, तेव्हा सत्तेला लाथ मारून बाहेर जाईन, माझ्या निष्ठेवर शंका घेऊ नका, असे प्रत्युत्तर विरोधकांना दिले. घोटाळ्याची चौकशी ही कोणत्याही सरकारी यंत्रणेमार्फत होणार नाही. ती निष्पक्षपणे होईल, असा दावा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला.
ताडदेव येथील एम. पी. मिल कंपाऊडमधील एस. डी. कॉर्पोरेशन राबवत असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत विकासकाला अनुकूल भूमिका घेतल्यामुळे प्रकाश मेहता अडचणीत आले होते. त्यानंतर कांदिवली पूर्व येथील समतानगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाबाबत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता. पण आता असेच आणखी एक प्रकरण समोर आल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या राजीनाम्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील तटकरे आणि शिवसेना आमदार यांच्यात खडाजंगी झाली. सुभाष देसाई हे शिवसेनेचे असल्याने, मुख्यमंत्री सरकार वाचवण्यासाठी मित्र पक्षातील मंत्र्यांना अभय देत असल्याचा आरोप केला. त्यावर अनिल परब यांनी कुणालाही वाचवण्याचा प्रश्न नाही असे म्हणत, राष्ट्रवादीचे अदृश्य हात मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी असल्याचा पलटवार केला.