काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांचं विधान अतिशय गंभीर असून ते स्वत:च्या जबाबदारीपासून पळ काढणार विधान आहे. कोरोनाच्या संकटात महाराष्ट्र सापडलेला असताना काँग्रेस पक्ष आपली जबाबदारी झटकून अपशयाचं संपूर्ण खापर मुख्यमंत्र्यांवर आणि शिवसेनेवर ढकलण्याचा प्रयत्न करीत असल्याचं त्यांच्या विधानावरून दिसून येतं, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
निर्णय घेणारा पक्ष नाही
कोरोनाशी मुकाबला करत असलेल्या महाराष्ट्रातील सरकारला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. महाराष्ट्रातील सत्तेत भलेही काँग्रेस पक्ष असला, तरी काँग्रेस पक्ष एकटा निर्णय घेणारा पक्ष नसून इतर दोन सहकारी पक्षही सोबत आहेत, असं विधान राहुल गांधी यांनी केलं आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.
राहुल गांधी यांचं आजचं विधान तर अतिशय गंभीर आहे. स्वत:च्या जबाबदारीपासून पळणारे हे विधान आहे. त्यांच्या विधानावरून काँग्रेस पक्ष आपली जबाबदारी झटकून संपूर्ण दोष मुख्यमंत्र्यांवर आणि शिवसेनेवर ढकलण्याचा प्रयत्न करीत आहेत,असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही वाचा - केंद्राने ठाकरे सरकारला दिले २८ हजार कोटी, देवेंद्र फडणवीस यांचा दावा
राहुल गांधीजी यांचे आजचे विधान तर अतिशय गंभीर आहे. स्वत:च्या जबाबदारीपासून पळणारे हे विधान आहे.
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) May 26, 2020
त्यांच्या विधानावरून काँग्रेस पक्ष आपली जबाबदारी झटकून संपूर्ण दोष मुख्यमंत्र्यांवर आणि शिवसेनेवर ढकलण्याचा प्रयत्न करीत आहेत : देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
सरकार स्वत:च पडेल
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा, महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा भाजपकडून प्रयत्न होत आहे, असा सत्ताधाऱ्यांकडून आरोप होत असताना, त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, सध्या लढाई कोरोनाविरूद्ध आहे. सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. ते स्वत:च्या अंतर्विरोधातून पडेल. सध्या कोरोनाच्या लढाईतून लक्ष विचलित करण्यासाठी, माध्यमांचं लक्ष इतरत्र वळविण्यासाठी अशा बातम्या दिल्या जात आहेत.
२८ हजार कोटी रुपये दिले
केंद्र सरकारने वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून आतापर्यंत ठाकरे सरकारला २८ हजार १०४ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. तरीही राज्य सरकारमध्ये समन्वय नाही. या काळात खर्च कशावर झाला, हे पाहिले तर या सरकारची प्राथमिकता काय आहे, हे सहज लक्षात येईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रातील कोरोना स्थिती अतिशय वाईट आहे. रूग्णसंख्या/मृत्यू यात मोठी वाढ झाली आहे. आता चाचण्यांची संख्या अतिशय कमी करण्यात आली आहे. सोमवारी केवळ २९०० चाचण्या केल्या आहेत. आता एकूण चाचण्यांपैकी ३२ टक्के रूग्ण पॉझिटिव्ह येत आहेत, असंही फडणवीस यांनी सांगितलं.